मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 227 वॉर्ड कायम, प्रभागरचना आराखडा तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 227 प्रभाग कायम राहणार आहेत.निवडणूक आयोगाने आज प्रभागरचनेबाबत जारी केलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुका 227 प्रभागांमध्येच घेतल्या जाणार आहेत. तसेच निवडणूक आयोगाने महायुती सरकारला प्रभागरचना आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.हा आराखडा तयार करण्याची जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांवर असणार आहे. लगतच्या जनगणनेनुसार ही प्रभाग रचना केली जाणार असल्याने यापूर्वी २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसारच ती होईल असे या आदेशातून स्पष्ट होते.

नगर विकास विभागाने या आदेशाबाबत माहिती दिली आहे. त्यात प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करून निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याची जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांची असणार आहे. मान्यतेनंतर ती प्रभाग रचना प्रसिध्द करून त्यावर हरकती आणि सूचना मागवाव्या लागणार आहे. त्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम प्रभाग रचनेचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना राज्य निवडणूक आयोगाकडे पुढील मान्यतेसाठी पाठवावा लागेल आणि आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर त्याला प्रसिध्दीही द्यावी लागेल.

आदेशातील मुद्दे…

– मुदतीतच निवडणुका घेणे शक्य व्हावे म्हणून राज्य शासनाने मुंबई महानगरपालिकेची मुदत संपणार त्या कालावधीच्या सहा महिने अगोदरच्या कालावधीत महापालिकेच्या क्षेत्रात व हद्दीमध्ये बदल करू नयेत असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

– प्रभाग रचना कशी करावी यासाठीही काही मार्गदर्शक तत्वे निवडणूक आयोगाने घालून दिली आहेत. त्यानुसार प्रभाग रचनेची सुरूवात उत्तरेकडून ईशान्येकडे करावी आणि त्यानंतर पूर्व दिशेकडे सरकून शेवट दक्षिणेत करावा. प्रभागांना त्याच पध्दतीने क्रमांकही द्यावेत. एका इमारतीचे, चाळीचे, घराचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

– अ, ब आणि क वर्गातील महापालिकांच्या निवडणुकांची प्रभाग रचना चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

– मुंबई, पुणे, नागपूर या महापालिका अ वर्गात मोडतात. ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड ब वर्गात तर नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली महापालिका क वर्गात मोडतात.

– प्रभाग रचना ही लगतच्या जनगणनेनुसार केली जाणार असल्याने ती २०११ च्या जनगणनेनुसारच होईल.

– सर्व महापालिकांतील प्रभाग रचना तीनपेक्षा कमी आणि पाचपेक्षा जास्त सदस्यीय नसावी.

– प्रभाग रचनेची माहिती गुगल अर्थवर द्यावी. त्यात लोकसंख्या आणि अनुसूचित जाती-जमातींच्या वस्त्या अधोरेखीत केल्या जाव्यात.

– प्रभाग रचना तयार करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ आणि अन्य अधिकाऱ्यांची समिती बनवण्यात यावी.