महाराष्ट्रात आत्महत्यांचं सत्र सुरूच; 10 महिन्यात तब्बल 2478 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, राज्य सरकारची माहिती

लहरी पाऊस, नापिकी, सरकारची धोरणांसंदर्भातील धरसोड वृत्ती आणि शेतमालाला योग्य भाव नसणं अशा कारणामुळं राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याची कबुली दिली आहे. तसेच सरकारकडून आकडेवारी देखील देण्यात आली आहे. जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या 10 महिन्यांच्या काळात महाराष्ट्रमध्ये 2478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्येची प्रकरणं समोर आल्याचंही माहितीतून उघड झालं आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार अमरावती विभागात 951, मराठवाडा विभागात 877, नाशिक विभागात 254, नागपूर विभागात 257, पुण्यात 27, लातूर जिल्ह्यात 64, धुळे जिल्ह्यात 28 अशा एकूण 2478 शेतकऱ्यांची आत्महत्येची प्रकरण समोर आली आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्या दरम्यान समोर आल्याची माहिती लेखी उत्तरात राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.