
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीसंदर्भात सातत्याने चर्चा सुरु आहे. अलमट्टीमुळे सांगली, कोल्हापूर जिह्यांना पुराचा धोका निर्माण होत असल्याबाबत वेगवेगळे अहवाल आहेत. मात्र, राज्य सरकारचा अलमट्टी उंचीवाढीला विरोधच आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान जिह्यातील अपूर्ण सिंचन योजनांसाठी 5 हजार कोटींची गरज असून, त्याबाबतचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.
वारणाली येथील जलसंपदा विभागाच्या कामांची आढावा बैठक घेतल्यानंतर जलसंपदा मंत्री विखे-पाटील बोलत होते. विखे म्हणाले, अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत राज्य सरकार गंभीर आहे. अलमट्टीसंदर्भात राज्य सरकार न्यायालयात गेलेले नाही असे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे. राज्य सरकारने तेलंगणा आणि आंध्रप्रदेश सोबत चर्चा केली आहे. कोणत्याही परिस्थितीत अलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही, हीच सरकारची भूमिका आहे, असेही विखे यांनी सांगितले.