
पाच वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नईसाठी यंदाचा हंगाम एका वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. 14 पैकी 10 सामने गमावल्यामुळे संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. परंतु हंगामातील आपल्या शेवटच्या सामन्यात चेन्नईने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरातला पाणी पाजत 83 धावांनी मोठा विजय साजरा केला आहे.
गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 230 धावा चोपून काढल्या होत्या. ब्रेविस (57), कॉन्वे (52) आणि उर्विल पटेल (37) यांनी ताबडतोब फटकेबाजी केल्यामुळे चेन्नईला 20 षटकांमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात 230 धावांचा डोंगर उभा करता आला. आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संपूर्ण संघ 18.3 षटकांमध्येच 147 धावसंख्येवर बाद झाला. साई सुदर्शन (41), अर्शद खान (20) आणि शाहरुख खान (19) यांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी थोडेफार प्रयत्न केले. परंतु इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत असल्यामुळे संघाला केवळ 147 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून अन्शुल कम्बोज आणि नुर अहमद यांनी सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या.