केडीएमसीची निवडणूक पॅनल पद्धतीने नकोच; एक राज्य एक निवडणूक प्रणालीसाठी शिवसेना, काँग्रेसचा आग्रह

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी यंदा प्रथमच पॅनल पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे. एकच राज्य असताना वेगवेगळ्या महापालिकांसाठी वेगवेगळी निवडणूक प्रणाली लागू करणे चुकीचे असल्याचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी राज्य शासन आणि पालिका आयुक्तांना दिले आहे.

केडीएमसीमध्ये नव्या प्रभाग रचनेनुसार सुमारे 50 हजार मतदारांमागे एक प्रभाग असणार आहे. यामध्ये 4 नगरसेवकांचे पॅनल असलेले 29 प्रभाग व 3 नगरसेवकांचे पॅनल असलेले 2 प्रभाग अशा 31 प्रभागांची रचना करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. मात्र नव्या प्रभाग रचनेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब शिवसेना, ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी विरोध केला आहे. सरकारने एकाच राज्यातील सर्व महापालिकांसाठी एकसमान प्रणाली लागू करावी. दुटप्पी धोरण मागे घ्यावे अशी मागणी म्हात्रे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे यांनीही पॅनल पद्धतीला विरोध केला आहे. मुंबई व केडीएमसी या दोन्ही महापालिका एकाच राज्यात असताना निवडणूक प्रणाली वेगळी का, हा अन्यायकारक प्रकार आहे. शिवाय कल्याण-डोंबिवली महापालिकेशी संबंधित 27 गावांचा प्रश्न अद्याप न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे अशा घाईघाईने प्रभाग रचना करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एक वॉर्ड एक उमेदवार

कल्याण-डोंबिवली महापालिकेत आजवर कधीही पॅनल पद्धतीने निवडणूक झालेली नाही. जेव्हा जेव्हा पॅनल प्रणाली लागू करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी जनतेने व विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. काही प्रकरणे न्यायालयातही पोहोचली होती. त्यामुळे आतापर्यंत एक वॉर्ड एक उमेदवार अशीच निवडणूक झाली आहे.