Mumbra Accident – कल्याण-कसारा-कर्जतच्या आठ हॉट स्पॉटवर मृत्यूचा दबा

मुंब्रा दुर्घटनेनंतर कल्याण-कसारा-कर्जत मार्गावरील बेभरवशाच्या प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरचा प्रवास म्हणजे चाकरमान्यांना धडकी भरवणारा असतो. सकाळी कामावर गेलेला घरातील कर्ता पुरुष किंवा महिला रात्री सुखरूप घरी येईलच याची शाश्वती नसते. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी लोकलला लोंबकळत प्रवास करावा लागतो. कल्याण-कसारा-कर्जत मार्गावर आठ धोकादायक स्पॉट आहेत. या ठिकाणी दररोज हमखास एक तरी अपघात होतोच. ट्रॅक ओलांडताना, लोकलमधून पडून किंवा फटका गँगमुळे रोज दुर्घटना घडतच आहेत. तरीही रेल्वे प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.

उपनगरीय रेल्वे प्रवासातील सीएसएमटी ते कसारा आणि कर्जत हा मार्ग सर्वाधिक गर्दीचा आहे. मात्र दुर्दैवाने या मार्गाकडे रेल्वे प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष नाही. दररोज सहा लाखांपेक्षा अधिक प्रवासी या दोन्ही मार्गांवर प्रवास करत असले तरी त्या तुलनेत प्रवाशांना सुविधा देण्यात मात्र रेल्वे कायमच हात आखडता घेत आहे. ठाण्यापासूनचा प्रवास तर अधिकच धोकादायक आहे. ठाणे ओलांडताच पारसिक बोगदा आला की प्रवाशांच्या काळजात धडकी भरते. पारसिक बोगद्यातून लोकल ये-जा करत असताना दरवाजात थांबलेल्या प्रवाशांची धाकधूक अधिकच वाढते. पारसिक बोगदा, मुंब्याचे वळण, दिवा, कोपर, ठाकुर्ली, विठ्ठलवाडी, शहाड, आंबिवली स्थानकाजवळची ठिकाणे सर्वाधिक धोकादायक आहेत. याच ठिकाणी विविध कारणांनी दुर्घटना घडत आहेत.

चोरवाटा कधी बंद होणार?
कल्याण हद्दीत सर्वाधिक 30 जणांना जीव गमावला आहे तर डोंबिवली हद्दीत 10, कर्जत हद्दीत 7 तर कसारा हद्दीत एका मृत्यूची नोंद आहे. रुळांवर येणाऱ्या अनेक वाटा मोकळ्या असल्याने यामधून गर्दुल्ले, चोर रेल्वे स्थानकात खुलेआम प्रवेश करत प्रवाशांच्या जीवाशी खेळत असतात. प्रवाशांना केवळ आवाहन करण्यापेक्षा रेल्वे स्थानकात येणाऱ्या चोरवाटादेखील रेल्वे प्रशासनाने बंद केल्या पाहिजेत, अशी मागणी प्रवाशांची आहे.

फटका गँगची डोकेदुखी
कल्याण स्थानकात बहुतांश लांबपल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस थांबतात. स्थानकात येण्याआधी गाड्यांचा वेग मंदावतो. नेमकी हीच संधी साधत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर फटका गँग दबा धरून बसलेली असते. कळवा, ठाकुर्ली, आंबिवली, विठ्ठलवाडी, वांगणी, आसनगाव, खर्डी, शहाड याठिकाणी सर्वाधिक चोरीच्या घटना घडल्या आहेत. मोबाईल चोरण्यासाठी ट्रॅकच्या शेजारी असलेल्या झुडपात दबा धरून बसलेले गर्दुल्ले काठीने प्रवाशांना फटके देतात. यामध्ये अनेकांचा लोकलमधून खाली पडून जीव गेला आहे. लोकलमध्ये भिकारी, चोरटे, फेरीवाले यांचा बिनधास्त वावर असतो. ठाण्यापासून कर्जत, कसारा मार्गावरील चोरटे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. स्थानक परिसर तसेच लोकल, मेल, एक्स्प्रेसमध्ये रोज चार तरी चोरीच्या घटना घडतात.