
बंगळुरूत विजयाचा जल्लोष 11 चाहत्यांच्या जिवावर बेतल्यामुळे अवघे बंगळुरूच नव्हे तर क्रीडा विश्व सुन्न पडले. साऱयांचेच कंठ दाठून आलेत. भावनासुद्धा व्यक्त करता येत नव्हत्या. हिंदुस्थानचे महान कर्णधार कपिल देव यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या चाहत्यांना श्रद्धांजली वाहिली आणि जल्लोषापेक्षा कधीही जीव महत्त्वाचा असतो. अशा यात्रा आयोजित करताना भविष्यात गांभीर्याने विचार करावा. आयोजक नव्हे तर चाहत्यांनीही संयम पाळावा, असा वडिलकीचा सल्ला कपिल देव यांनी दिला.
काल चेंगराचेंगरी झालेल्या घटनेने चाहत्यांचेच नव्हे तर त्या दुर्घटनेत सामील असलेल्या साऱयांचेच डोळे उघडले आहेत. या दुर्घटनेचे खापर आरसीबी, पोलीस, प्रशासन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर फुटणार हे निश्चित आहे. ही दुर्घटना दुःखद असली तरी ही टाळता आली असती. हे सारे ढिसाळ नियोजनाचेच बळी असल्याची सर्वांचीच प्रतिक्रिया आहे. कपिल देव यांनी मात्र कोणावर आरोप-प्रत्यारोप न करता या दुर्घटनेने साऱयांनाच सुन्न केलंय. दुःख सर्वांनाच झालेय, पण अशा घटनांपासून आम्हाला एकमेकांपासून शिकायला हवे. बोध घ्यायला हवा. जेव्हा भविष्यात विजय यात्रेबाबत कधी विचार केला जाईल तेव्हा लोकांना, चाहत्यांना आणि आयोजकांना अधिक खबरदारी पाळायला हवी. स्वतःच्या भावनांवर संयम ठेवायला हवा. चाहते चुका करतातच, याचीही कल्पना असायला हवी. विजेता संघ आणि अन्य हितधारकांनीही अशा कार्यक्रमाची तयारी करताना सर्व बाबींचा विचार करावा, अशी विनंतीही कपिल देव यांनी केली.
घटना दुःखदच आहे, चुका इतक्या मोठय़ाही व्हायला नको की तुम्ही मजामस्ती, जल्लोष करताय आणि कुणाला आपला जीव गमवावा लागतोय. यापुढे अशा यात्रांचा सगळय़ा बाजूंनी विचार व्हायला हवा. जो संघ जिंकलाय, त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे. जल्लोषापेक्षा जीव महत्त्वाचा आहे, याच दृष्टीने प्रत्येकाने विचार करायला हवा.
विराट कोहली सुन्न
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर विजेत्या आरसीबी संघाची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते आपला जीव धोक्यात घालत होते. यात चेंगराचेंगरीची दुःखद घटनाही घडली. ही घटना घडल्यानंतर बाहेर शोककळा पसरली असताना स्टेडियमच्या आत जल्लोष साजरा केला जात होता. या घटनेनेही चाहत्यांना अतीव दुःख झालेय. आयोजकांना, हितधारकांना या गोष्टीची काहीएक पडली नसल्याची टीका केली जातेय. लोक मरत होती आणि तरीही जल्लोष सुरू होता. याबाबत कोहलीनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्याजवळ बोलण्यासाठी शब्दच नाहीत. मी पूर्णपणे तुटलोय. कोहलीसह एबी डिव्हिलियर्सनेही या दुर्घटनेबाबत आपल्या संवेदना व्यक्त केल्या आणि मृतांसाठी प्रार्थना केली.
मृत कुटुंबीयांना दहा लाखांची मदत
काल कर्नाटक राज्य सरकारने चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या चाहत्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत जाहीर केली होती, तर आज आरसीबीच्या व्यवस्थापनानेही दहा लाखांची मदत जाहीर करून मृतांच्या नातेवाईकांवर मलम लावण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या घटनेतील मृत आणि जखमींच्या मदतीसाठी आरसीबी केअरमार्फत सहाय्य निधीही उभारला जाणार असल्याची माहिती आरसीबी व्यवस्थापनाने पत्रकाद्वारे दिली.
विराटला चेंगराचेंगरीची कल्पना नसावी
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांनी प्राण गमावल्यानंतरही स्टेडियममध्ये जल्लोष सुरू असल्याबाबत अनेकांनी आरसीबी, आयोजक आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. मात्र ही घटना घडल्याची विराट कोहलीला कल्पना देण्यात आली नसावी. बाहेर लोक मरताहेत आणि कोहली आत कार्यक्रमात आहे, असे होऊ शकते यावर मी विश्वासच ठेऊ शकत नाही. संघातील खेळाडू वगळता आरसीबी व्यवस्थापन आणि या इव्हेंटचे राजकारण करणाऱयांना या घटनेची कल्पना होती. राजकारणी मोठय़ा चामडीचे असतात, निर्दयी असतात. तसेच कॉर्पोरेट कंपन्याही तशाच असतात. फ्रेंचायझी आणि राजकारण्यांना फक्त आपल्या मार्केटिंगचेचे पडलेले असते. त्यांना या चेंगराचेंगरीची निश्चितच कल्पना असेल, पण जोपर्यंत विराट आणि आरसीबी संघाला या घटनेची माहिती मिळाली तोपर्यंत घटना झाली होती. यात त्यांची कोणतीही भूमिका नव्हती. विराटला या घटनेबाबत कल्पना होती आणि तरीही तो कार्यक्रमात हजर होता, असे असेल यावर मी विश्वासच ठेऊ शकत नसल्याचे माजी कसोटीपटू अतुल वासन म्हणाला.