
आपल्याकडे फार पूर्वीपासून आपल्या आहाराला आर्युर्वेदाची जोड आहे. म्हणूनच आपल्या बहुतांशी खाण्याच्या सवयी या आर्युर्वेदाच्या आसपास असतात. फार पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे जेवणाची सांगता करताना, किमान दोन घास दही भात खाण्याची पद्धत होती. आज ही पद्धत लुप्त होत चालली आहे.
निरोगी आरोग्यासाठी आहारही परिपूर्ण असायलाच हवा. आपण आहार जितका उत्तम ठेवू तितकी आपली प्रकृत्ती उत्तम राहते. म्हणूनच आहारात काही साधे सोपे बदलही खूप महत्त्वाचे आहेत. आहारामध्ये दहीभाताचा समावेश केल्यास आपल्याला खूप फायदा मिळतो. दही भात हा एक असा पदार्थ आहे याला पाहून अनेकजण नाक मुरडतात. परंतु काही लोकांना दही भाताशिवाय घासही जात नाही. दही भात पचायला हलका असल्याने, त्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा भरपूर आहेत.
दह्यासोबत भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळेच सध्याच्या घडीला अनेकांनी आहारात दही भाताचा समावेश केलेला आहे. दही आणि भात खाल्ल्याने वजन कमी होते आणि हाडेही मजबूत होतात. दही आणि भात खाण्याचे आणखी अनेक फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
दहीभात खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
वजन कमी करणाऱ्यांसाठी दही भात हा एक उत्तम पर्याय मानला गेला आहे. परंतु याजोडीला आवश्यक व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे. दही भाताचा आहारात समावेश केल्यामुळे भूक कमी लागते. यामुळेच वजन कमी होण्यासही खूप मदत होते.
दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते असे संशोधनात सिद्ध झाले आहे.
मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. याचाच अर्थ असा की, आपण खाल्लेल्या गोष्टींपासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते.
दही भात खाण्यामुळे आपला मूड चांगला होणे, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे होतात.
दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात तुम्ही मदत करता.
दहीभात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासही मदत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा सर्वसामान्य गैरसमज आहे. मात्र दही भात खाणे हितकारक ठरू शकते. त्यामुळे वजन वाढत नाही तर कमी होतं.
तापात आपल्याला काहीच खाण्याची इच्छा होत नाही, परंतु तापामध्ये दही भात खाल्ल्यावर, शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसंच दह्यामुळे इम्मुनिटी देखील वाढते.
पोट बिघडल्यावर दही भात हा उत्तम उपाय आहे. दही भाताने पोट शांत होते, तसेच अन्नही व्यवस्थित पचते आणि जुलाबावर आराम मिळतो.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)