
पावसाळा असल्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर 31 जुलैपर्यंत मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र मुंबईतील ससून डॉकमध्ये मोठय़ा प्रमाणात इतर राज्यातूनही ताजी मासळी येत असते. या मासे विक्रीवरच कोळी समाजातील कष्टकऱयांचे पोट आहे. हेच मासे मुंबईतील उपाहारगृहे, पंचतारांकित हॉटेल्स, मच्छी मार्पेटमध्ये पुरवले आणि विकले जातात. मात्र, ससून डॉकमध्ये माशांवर विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने ही अन्यायकारक बंदी उठवावी आणि कोळी समाजाला दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना दक्षिण विभागप्रमुख संतोष शिंदे आणि उपविभागप्रमुख कृष्णा पोवळे यांनी राज्य सरकारकडे पत्र पाठवून केली आहे.
पावसाळा सुरू झाल्यामुळे राज्य मत्स्यव्यवसाय विभागाने मुंबई पोर्ट ट्रस्टला पत्र पाठवून मासेमारी बंदीबरोबर ससून डॉकमध्ये मासे विक्रीला बंदी घालण्याची मागणी केली. ती मान्य करून ससून डॉकमध्ये मासे विक्री, मासे वाहनातून उतरवणे तसेच इतर सर्वांसाठी बंदी घातली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने नोंदणीकृत मच्छीमार संस्थांशी थेट संवाद साधण्याऐवजी मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत पत्रव्यवहार का केला, असा सवाल शिवसेनेने केला आहे.
…तर मग मासे निर्यातीवरही बंदी आणा!
जर पावसाळय़ात मासळी विकणे चुकीचे असेल तर मग सरकार मासळी निर्यातीवर बंदी आणणार का? पंचतारांकित हॉटेल्स, उपाहारगृहे आणि इतर मासळी बाजारात मासळी विक्री व पुरवठय़ावर बंदी घालणार का? ससूनमध्ये दररोज काम करणाऱया हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचे काय, असा सवाल विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी केला आहे.