इस बार बडा खेला होगा, ममता बॅनर्जी यांचा भाजपवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बीरभूम जिल्ह्यातील नानूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर सडकून टीका केली. “इस बार बडा खेला होगा (यावेळी निवडणुकीत मोठा खेला होणार),” असा इशारा देत त्यांनी भाजपला आव्हान दिले आहे.

ममता बॅनर्जी यांनी भाजपवर सत्तेचा आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करत म्हणाल्या की, “निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले अधिकारी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याचा प्रयत्न करत आहेत.” त्या म्हणाल्या की, जेव्हा बंगाल देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देत होता, तेव्हा भाजपचा जन्मही झाला नव्हता.”

निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करताना त्यांनी आरोप केला की, “एसआयआरच्या नावाखाली मतदारांची नावे, विशेषतः महिलांची नावे यादीतून वगळली जात आहेत. भाजप आता तेच करत आहे जे एकेकाळी डावे (CPI-M) करत असत. नावांच्या आधारे ती यादीतून हटवली जात आहेत आणि या विरोधात मी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.”

आपल्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना सावध राहण्याचे आवाहन करताना त्या म्हणाल्या की, उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणतीही चूक करू नका. भाजप बंगालमध्ये पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही, याची आम्ही खात्री करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.