धोकादायक दरडींपासून बचावासाठी संरक्षक जाळी, रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी म्हाडाचा पुढाकार; पाच कोटी रुपयांचा खर्च करणार

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाशांना पावसाळय़ात जीव मुठीत घेऊन रहावे लागते. या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी म्हाडा आता विविध ठिकाणी संरक्षक जाळी उभारणार आहे.  एमएसआरडीसीच्या कामाचा अनुभव असलेल्या एका एजन्सीची या कामासाठी नियक्ती करण्यात आली असून म्हाडा आपल्या फंडातून 5 कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील दहिसर, कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, अणुशक्तीनगर, चुनाभट्टी अशा ठिकाणी डोंगरालगत हजारो झोपडय़ा आहेत. पावसाळय़ात डोंगरालगत असलेल्या या झोपडय़ांवर दरड कोसळून एखादी मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नऊ मीटर उंचीच्या संरक्षक भिंती उभारल्या जातात. जिथे अजूनही संरक्षक भिंती उभारण्यासाठी टेंडर निघालेले नाही, पण खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळय़ात काम करण्याची गरज आहे अशा ठिकाणी म्हाडा आता संरक्षक जाळी उभारणार आहे.

पंधरा ठिकाणी संरक्षक जाळी उभारणार

पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करून दरडप्रवण क्षेत्रांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांकडून ही यादी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडे आली आहे. त्यानुसार ज्या भागात अजूनही संरक्षक भिंती नाहीत. पण पावसाळय़ात तिथे दरड कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते अशा 15 ठिकाणी म्हाडा संरक्षक जाळी उभारणार आहे, अशी माहिती  म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीची वाट न पाहता म्हाडाच्या फंडातून 5 कोटी रुपये खर्च करण्यासाठी उपाध्यक्षांनी परवानगी दिली आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.