
>> डॉ. समिरा गुजर जोशी
गैरसमज कसे होतात हे नेमके सांगता येत नाही, पण ते होतात तेव्हा एखादे नाते क्षणात उद्ध्वस्त होऊ शकते. संशय हे अनेकदा गैरसमजाचे मूळ असलेले आपल्याला दिसते. घरगुती नात्यांमध्येही आपण पाहतो की, मला प्रिय असलेली व्यक्ती माझ्या पूर्णपणे अधीन आहे की नाही? ती माझ्याशी निष्ठावान आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित झाला की, गैरसमजाला सुरुवात होते. याचे एक उत्तम उदाहरण रामायणात येते ते सुग्रीव आणि वाली यांच्या कथेत. किष्किंधा कांडात येणारी या दोन बंधूंची कथा मला अनेक गोष्टींमुळे फार वैशिष्टय़पूर्ण वाटते. त्याविषयी आपण बोलूच, पण आज मला सांगायचे आहे ते गैरसमजाविषयी.
जेव्हा सीतेचा शोध घेत प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण ऋष्यमूक पर्वतावर पोहोचतात तेव्हा घाबरलेला सुग्रीव त्यांना बघून जवळच्या दुसऱया पर्वतावर पळून जातो. ही अपरिचित माणसे म्हणजे वालीने पाठवलेले मारेकरी असतील तर ही त्याची भीती आहे. जेव्हा राम-लक्ष्मण सुग्रीवाला भेटतात तेव्हा श्रीराम त्याला हेच विचारतात की, मी वालीविरुद्ध लढायला तुला मदत करीन, पण वाली आणि तू सख्खी भावंडे आहात. तुमच्या दोघांमध्ये इतके विकोपाला गेलेले भांडण निर्माणच कसे झाले? त्यानंतर सुग्रीवाने त्यांना ही कहाणी सांगितली. वाली लहानपणापासूनच पराक्रमी होता आणि वडिलांचाही लाडका होता. तो तरुण झाल्यानंतर वडिलांनी राज्यकारभार त्याच्यावर सोपवला. सुग्रीवही आपल्या भावाच्या आज्ञेत होता. सगळे सुरळीत सुरू असताना एके दिवशी रात्री एका मायावी राक्षसाने वालीला नगराबाहेर येऊन युद्धासाठी आव्हान दिले. हे आव्हान त्याने स्वीकारू नये म्हणून त्याची पत्नी तारा आणि सुग्रीव या दोघांनीही त्याला परोपरीने समजावले, पण वालीने ऐकले नाही. मग सुग्रीवही त्याच्या मदतीसाठी त्याच्या पाठोपाठ धावला. वाली आणि तो मायावी राक्षस एकमेकांशी लढत एका गुहेपर्यंत पोहोचले. राक्षस त्या गुहेत पळाला. वाली सुग्रीवाला म्हणाला, “मी त्याच्या मागावर जातो. तू माझी वाट बघत इथेच थांब.’’ सुग्रीव त्याप्रमाणे गुहेबाहेर थांबला. एक वर्ष झाले तरी वाली बाहेर आला नाही. कालांतराने गुहेतून रक्ताचे पाट वाहू लागले. वाली मारला गेला असावा असे वाटून सुग्रीवाने त्या गुहेचे तोंड पाषाणखंड ठेवून बंद केले. त्यानंतर तो राज्यकारभार पाहू लागला. सुग्रीवाची पत्नी तारा हिलाही तो आदराने वागवत होता. अशात एके दिवशी गुहेचे तोंड उघडून वाली परत आला. सुग्रीवाला गादीवर बसलेले बघून तो चिडला. सुग्रीव त्याला बघून आनंदला. आपला भाऊ परत आला आहे तर त्यानेच आता राज्य सांभाळावे ही इच्छा त्याने व्यक्त केली. पण या कशाकडे सुग्रीवाचे लक्ष गेले नाही. कारण त्याच्या मनात गैरसमजाने ठाण मांडले होते की सुग्रीव राज्यलोभामुळे आपल्याला सोडून निघून आला. वर त्याने गुहेचे तोंडही बंद केले. म्हणजे आपण कधीच परतू शकणार नाही. त्याच्या बायकोने, तारानेही त्याला सांगितले की, तू गुहेत गेल्यानंतर परिस्थिती फार विचित्र झाली. राज्यावर आक्रमण करायला शत्रू टपून होते. अशा वेळी सुग्रीवाला राज्य सांभाळणे भाग होते, पण वालीची समजूत पटली नाही.
एकदा गैरसमज झाला की, माणूस पुढचा मागचा विचार करत नाही आणि काही वेळा परिस्थिती अशी असते की, आपण डोळ्यांसमोर जे दिसते त्यापेक्षा सत्य वेगळे असेल अशा शक्यतेचा विचारही करत नाही. सुग्रीवाने गुहेचे दार बंद का केले? हा असाच मुद्दा आहे. वालीचा जो ग्रह झाला आहे तो होणे तसे स्वाभाविक नाही का? सुग्रीवाने वालीचा अधिक शोध घ्यायला हवा होता, पण त्याने तसे प्रयत्न केलेच नसतील कशावरून? आणि राज्यावर शत्रूच्या आक्रमणाचे संकट असताना त्या गुहेतून राक्षस परतला तर? या भीतीने त्याने गुहेचे तोंड बंद करावे हा त्याच्या मंत्र्यांचा सल्ला होता. पण रागाने बेभान झाल्यावर हे स्वीकारणे वालीला शक्यच नव्हते. उलट त्याने जुन्या मंत्र्यांनाही सुग्रीवाबरोबर राज्याबाहेर घालवून दिले. परंतु सुग्रीवाच्या बायकोला, रुमाला मात्र स्वतच्या ताब्यात ठेवले. इतकेच नव्हे तर सुग्रीवाला मारण्यासाठी तो सतत मारेकरी पाठवत असे. कारण सुग्रीव आपल्या वाईटावर आहे हा त्याचा पक्का (गैर) समज होता.
या दोन्ही भावांचे हे भांडण मिटले ते वाली मरणासन्न असताना. तो प्रसंग फार हृदयस्पर्शी आहे. त्याविषयी आपण पुढे बोलू. पण वाली जर गैरसमजापासून स्वतला लांब ठेवू शकला असता तर? राम आणि भरत यांचे नाते यानिमित्ताने पुन्हा डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाही.
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)