गॅसबत्ती, टॉर्च, मशाली घेऊन रात्रीची शोधमोहीम; चविष्ट, खमंग, मुठ्यांवर खवय्यांच्या उड्या

विक्रमगडसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून मासेमारी बंद असल्याने ग्रामीण भागात ताजे, फडफडीत मासे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे चिकन, मटणाचे भाव वधारले आहेत. खवय्यांचा मोर्चा आता चविष्ट आणि खमंग मुठ्यांकडे वळला आहे. गॅसबत्ती, टॉर्च, मशाली हाती घेऊन मुठघांना (खेकडे) शोधण्यासाठी रात्रीची मोहीम सुरू झाली आहे. फक्त पावसाच्या सुरुवातीलाच मिळणाऱ्या या लज्जतदार मुठ्यांना ग्रामीण भागातील खवय्यांच्या उड्या पडत आहेत.

पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुठे मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. शहरात 80 ते 100 रुपये डझन या दराने मुठे मिळतात. त्यावर ताव मारण्यासाठी शहरातील चाकरमान्यांनी गावाकडे धाव घेतली आहे. माळरान, शेत, शेताचा बांध, डोंगरात बिळ करून राहतात त्यामुळे ते विक्रमगडमधील ग्रामीण भागात सापडतात.

मुठे पकडण्यासाठी खवय्ये हातात गॅसबत्ती, टॉर्च किंवा जळती मशाल घेऊन घराबाहेर पडतात. सोबत मुठे ठेवण्यासाठी सिमेंटचे पोते, कळशी किंवा बादली असते. रात्रभर माळरान, शेत, बांध, गवताळ भाग किंवा डोंगर उतारवर फिरून मुठे पकडले जातात. बत्तीच्या किंवा टॉर्चच्या उजेडात हे मुठे थांबतात.