Pandharpur Wari 2025 – मुस्लिम तरुणाची विठ्ठल भक्ती; दगड फोडणाऱ्या भक्तानं अर्पण केला चांदीचा मुकूट

>> सुनील उंबरे

संत तुकाराम आणि संत अनगडशाह बाबा या दोघांमध्ये असलेलं प्रेमाचं नातं पुढची पिढी आजही जतन करताना दिसत असून गणी सय्यद या मुस्लिम युवकाने श्री विठ्ठल चरणी लीन होत एक किलो चांदीचा मुकूट अर्पण केला. जातीयतेचा द्वेष पसरविणाऱ्या मंडळींसाठी गणीची ही अनोखी भक्त चपराक देणारी आहे.

गणी सय्यद (रा. लातूर) हा युवक कोणी उद्योगपती, राजकारणी अथवा गर्भश्रीमंत व्यक्ती नाही तो आहे एक दगड फोडणारा मजूर…मोठ्या कष्टाने घाम गाळून कमावलेल्या पैशातून त्याने एक लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकूट देवादी देव पांडुरंगाच्या चरणी वाहिला.

वारकरी संप्रदाय हा संतपरंपरेचा वारसा लाभलेल्या या महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या संप्रदायांपैकी एक. समाजातील सर्व घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न हा संप्रदाय कायमच करत आलाय. आपल्या चाली-रीतींमधून समाजासमोर नेहमीच आदर्श निर्माण करत आलाय. या संप्रदायातील सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या चालीरीती समाजात दुहीचा विचार पेरणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या आहेत.

सर्व जातींना, सर्वधर्मीयांना एकाच छताखाली आणणारा हा वारकरी संप्रदाय आहे. जात-धर्म-परंपरा यांच्या पलीकडे गेलेला पालखीसोहळा अवघ्या जगाला एकात्मतेचा संदेश देतो. कारण गेल्या शेकडो वर्षांपासून तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा घेते ती हजरत अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात.

दर्ग्यासमोरील मेघडंबरीत तुकाराम महाराजांची पालखी ठेवली जाते. ही मेघडंबरी अभंग-आरतीस्थान म्हणून ओळखली जाते. अनगडशाह बाबांच्या समाधीसमोर तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर तिथं अभंग गायिले जातात. यादरम्‍यान दर्ग्‍यात पालखीची पूजाही केली जाते. पुढं वारी पंढरपूरकडे मार्गस्थ होताना वारकरी अनगडशाह बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला निघतात.

अनगडशाह बाबा आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीसोहळ्याची सुमारे चारशे वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम समाजाची एकता-समता-बंधुभाव यांचं प्रतीक म्हणून ही प्रथा आजही जपली जाते. तुकाराम महाराज आणि अनगडशाह बाबा या दोन संतांच्या भेटीचं प्रतीक म्हणून या भेटीकडे आजही पाहिलं जातं. या भेटीचे साक्षीदार होण्यासाठी हजारो हिंदू-मुस्लिम भाविक या ठिकाणी येतात.

गणी सय्यद सारखे अनगडशाह बाबांचे अनुयायी आजही श्री विठ्ठलावर हिंदू इतकीच श्रद्धा आणि आस्था बाळगतात मुस्लिम धर्मामधील धर्मांध बाटग्यांनी यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. गणीच्या या अनोख्या भक्तीने भारावलेल्या मंदिर समितीने गणिला सन्मानपूर्वक दर्शन आणि सत्कार करुन त्याचा गौरव केला.