विशाळगडावर सण-उत्सव करण्यास पोलीस प्रशासनाचा मज्जाव, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर मलिक रेहान उरूसातील प्राण्यांच्या कुर्बानीसाठी मुंबई हायकोर्टाने, हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर सशर्त परवानगी दिली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी विशाळगडावर ईद आणि उरूस साजरा केल्यास उधळून लावू, असा इशारा दिला होता.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने, जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, निर्णयाची प्रतीक्षा असतानाच तूर्त विशाळगडावर कोणताही सण-उत्सव साजरा करण्यास पोलीस प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन दिवसांपूर्वी बकरी ईदच्या निमित्ताने मुंबई हायकोर्टाने काही नियम व अटी घालून विशाळगडावर कुर्बानी देण्यास परवानगी दिली आहे. याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करत, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊन या निर्णयाविरोधात दाद मागावी, अशी मागणी केली होती. तसेच विशाळगडावरील उरूस उधळून लावू, असा इशाराही हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आला होता.

विशाळगडावर मुंबई उच्च न्यायालयाने कुर्बानीसाठी परवानगी दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या वर्षी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या कारणाने जिल्हा प्रशासनाने विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.