
सुमद्रकिनाऱ्यावर वाहने घेऊन जाणाऱ्या पर्यटकांना शिस्त लावण्यास जिल्हा प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले. यामुळे आता पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आजूबाजूला मिळेल ते साहित्य वापरून समुद्रकिनाऱ्यावर जाणारे रस्ते बंद करण्याची मोहिम पोलिसांनी हाती घेतली आहे. दापोली तालुक्यातील मुरूड, कर्दे तसेच रत्नागिरी तालुक्यातील जयगड, भाट्ये, आरे-वारे, गणपतीपुळे आणि काजीरभाटी किनारे पोलिसांनी दगड, चिरे, माड, झाप आणि लाकडं गोळा करून बंद केले आहेत.
रत्नागिरी पोलिसांनी समुद्र किनाऱ्यावर वाहन चालविण्यास मनाई केली असून कुणी किनाऱ्यावर वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावर कुणी वाहन चालवत असेल तर 112 ला फोन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक ग्रामपंचायतींना महसूल मिळतो. काही ठिकाणी पार्किंग शुल्कही आकारले जाते. मात्र वाहने समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये याकरिता कोणतीही उपाययोजना योजना केली जात नाही. निधी मिळत नाही अशी उत्तरे दिली जातात. आज पोलिसांनी काही समुद्र किनाऱ्यावर आजूबाजूला पडलेले दगड, चिरे, माड, झाप आणि लाकडं गोळा करून बॅरिकेडिंग केले आहे. निधी नाही म्हणून काम न करणाऱ्या संबंधित प्रशासनाला पोलिसांनी इच्छाशक्ती असेल तर काही करू शकतो हे दाखवून दिले आहे.