
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यात जेथे शक्य आहे, तेथे युती म्हणून सामोरे जाऊ. पण, जेथे शक्य नाही, तेथे स्वबळावर आणि ताकदीने निवडणूक लढू,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात पटेल बोलत होते. पटेल म्हणाले, ‘पक्ष मोठा झाला तर आपण मोठे होणार आहोत. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होतानाच पहिल्या दिवसापासूनच सांगितले की, आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जेथे शक्य असेल, तेथे युती केली जाईल. जेथे शक्य नाही, तेथे स्वबळावर लढू.’
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या; पण विधानसभा निवडणुकीत आपल्याला 288 पैकी 237 जागा मिळाल्या. शेतकरी आणि लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मतदान केले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत; पण जेथे शक्य नाही, तेथे स्वतंत्र लढणार आहोत.’
एका ताटात जेवलो हे कधीही विसरणार नाही! सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला
सुनील तटकरे म्हणाले, ‘गेली आठ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे चार महिन्यांनंतर येणाऱ्या या निवडणुकांना आपल्याला मोठ्या ताकदीने सामोरे जायचे आहे.’ महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, “लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून आम्हा महिलांना ताकद आणि आत्मविश्वास दिला.’