बिहारचे डबल इंजिन सरकार महिलांसाठी धोकादायक, प्रियांका गांधी यांचा नितीश कुमार सरकारवर हल्ला

बिहारमध्ये दर हजारी मुलांमागे केवळ 891 मुलींचा जन्म होत आहे. अखेर असे का होत आहे, मुलींचा जन्मदर का घसरत आहे यावरून बिहारचे डबल इंजिन सरकार महिलांसाठी धोकादायक ठरत आहे, अशा शब्दांत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी नितीश कुमार सरकारवर एक्सवरून जोरदार हल्ला चढवला आहे.

एका बाजूला महिलांवर सातत्याने होणारे लैंगिक अत्याचार आणि दुसऱ्या बाजूला मुलींचा घसरत असलेला जन्मदर देशातील अत्यंत गंभीर स्थिती दर्शवतो, असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी यांनी एक्सवरून एका अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात 2022 च्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एक हजार मुलांमागे 891 मुली जन्माला येत आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात 906, तेलंगणात 907, हरयाणात 908, उत्तराखंडमध्ये 910 असे प्रमाण आहे. बिहारमध्ये 2020 मध्ये हाच आकडा 964 होता. 2021 मध्ये त्यात घसरण होऊन तो 908 झाला, तर 2022 मध्ये केवळ 891 झाला. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे, असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.