गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला! पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात रुग्णसंख्या 73 वर

‘गुलेन बॅरी सिंड्रोम’चा (जीबीएस) धोका वाढला असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुण्यात सहा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 73 वर पोहोचली आहे. शहरी भागाच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 44 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरात ११ आणि पिंपरी-चिंचवड शहरात 15 रुग्णांची नोंद झाली आहे. इतर तीन रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.

पुण्यात आतापर्यंत नोंद झालेल्या 73 रुग्णांपैकी 47 पुरुष रुग्णांचा तर 26 महिला रुग्णांचा समावेश आहे. यातील 14 रुग्णांवर ‘व्हेंटिलेटर’वर उपचार सुरू आहेत. जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेला आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रुग्णांच्या शौच, रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच शहराच्या विविध भागांतील पाण्याचे नमुने रासायनिक व जैविक तपासणीसाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांकडे पाठविण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांनी ‘जीबीएस’चे रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दूषित पाण्यामुळे प्रसार

जीबीएस आजाराला ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू कारणीभूत ठरत असल्याचे तपासातून समोर आले आहे. हा जीवाणू दूषित पाण्याच्या माध्यमातून पसरत असल्यामुळे आरोग्य विभागाकडून विविध भागातील पाण्याचे नमुने रासायनिक व जैविक तपासणीसाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांकडे पाठविण्यात येत आहेत.

सात हजार घरांचे सर्वेक्षण

राज्याच्या आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार रुग्ण आढळून आलेल्या परिसरात घरोघरी सव्र्व्हेक्षण करण्यात येत असून, आतापर्यंत पुणे महापालिका हद्दीतील एक हजार 943, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एक हजार 750 आणि ग्रामीण भागातील तीन हजार 522 अशा एकूण सात हजार 215 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी

पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, स्वच्छ व ताजे अन्न सेवन करावे, वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा, उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे, अचानक हाता-पायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. हा आजार वाढल्यास अर्धांगवायूचा धोका होऊ शकतो.