विमानतळबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील! खासदार संजय राऊत यांची पुरंदरवासीयांना ग्वाही

‘पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहील,’ अशी ग्वाही शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिली. पुरंदर विमानतळबाधित शेतकऱ्यांसह विमानतळविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, पुरंदर तालुकाप्रमुख अभिजित जगताप आदी उपस्थित होते.

पुरंदर विमानतळासाठी संपादित केली जाणारी जमीन बागायती आहे. या जमिनीवर या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. पिढ्यान्पिढ्या या मातीशी जुळलेली नाळ विमानतळामुळे कायमची तुटणार आहे. त्यामुळे भूसंपादनाला येथील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. त्यासाठी 5 मे रोजी अनेक शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीचार्ज केला. या आंदोलनात 87 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला होता. या बाधित शेतकऱ्यांसह विमानतळविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा, अडचणी, तसेच प्रशासनाच्या अनास्थेविरोधातील कैफियत मांडली. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी ही ग्वाही दिली.

शिवसेना उपनेते व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट झाली. यावेळी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, पुरंदर तालुकाप्रमुख अभिजित जगताप, विमानतळविरोधी लढ्याचे प्रणेते पी. एस. मेमाणे, नीरा मार्केट कमिटीचे देवीदास कामथे, वनपुरी गावचे माजी सरपंच एकनाथ कुंभारकर, वाशी मार्केटचे व्यापारी गणेश मोरे, पारगावचे उपसरपंच चेतन मेमाणे, उद्योजक बाळासाहेब कुंभारकर, राजू कुंभारकर, उदाचीवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य विकास कुंभारकर, तसेच मनीष हगवणे आदी उपस्थित होते.

खासदार संजय राऊत यांनी सर्व मुद्दे आस्थेवाईकपणे ऐकून घेतले. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची कायदेशीर व तांत्रिक बाजू समजून घेत त्यांना दिलासा दिला. शिवसेना पक्ष प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी दिली.