
जगप्रसिद्ध कवी, नाटककार आणि ‘नोबेल’ विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील वडिलोपार्जित घराची संतप्त जमावाने तोडपह्ड केली. या घटनेवरून हिंदुस्थानने बांगलादेशातील हंगामी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.
‘कछरीबारी’ हे सिराजगंज जिह्यात स्थित टागोर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर आणि महसूल कार्यालय आहे. येथील वास्तव्यातच टागोर यांनी त्यांच्या अनेक साहित्यकृती लिहिल्या आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्या घरावर झालेला हिंसक हल्ला थोर कवीच्या स्मृतीचा आणि त्यांच्या सर्वसमावेशक तत्त्वांचा अपमान असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले. सहिष्णुतेचे प्रतीक पुसून टाकण्यासाठी आणि बांगलादेशचा सुसंवादी सांस्कृतिक वारसा नष्ट करण्यासाठी अतिरेक्यांनी केलेल्या सुनियोजित प्रयत्नांचा हा एक भाग होता, असे जयस्वाल म्हणाले. अशा घटना वारंवार घडत असल्याचेही त्यांनी सांगितले.