
मे महिन्यात धुवांधार बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने विक्रमी पावसाची सलामी दिली. त्यानंतर जून महिन्यात मात्र पावसाने मात्र दडी मारली आहे. एकीकडे पाऊस रुसला असताना दुसरीकडे सूर्य मात्र कोपला असून ऐन पावसाळ्यात उकाडा जाणवू लागला आहे. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तर शहराचे तापमान ३३.४ अंशांपर्यंत पोहचले होते. वरुणराजा या उकाड्यापासून लवकर सुटका कर रे बाबा…असे साकडेच अनेकांनी घातले आहे.
ठाण्यात ऐन मे महिन्यात भरउन्हाळ्याचा माहौल असताना मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. २० मेपासूनच पावसाने ठाणेकरांना झोडपून काढले. त्यानंतर गेले काही दिवस ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळाला तर जूनपासून पावसाने पाठ फिरवली आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना कोसळधारेने भिजवणारा पाऊस आता गायब झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस पुढील काही दिवस सुट्टीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकरी चिंतातूर
पावसाने दडी मारल्याने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत मात्र शेतीला आवश्यक अशा पावसाला सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.