
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ताज लँड्स एण्ड हॉटेलमध्ये भेट झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी ही भेट कशासाठी होती याबद्दल स्पष्ट केलेले नाही. मात्र या भेटीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेन्शनमध्ये आले आहेत. फडणवीस-राज ठाकरे यांची वाढती जवळीक आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते, अशी भीती शिंदे यांना वाटू लागली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट मंत्रालयात, वर्षा बंगल्यावर किंवा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी न होता ती ताज लँड्स एण्ड हॉटेलमध्ये झाली. सुमारे तासभर ही भेट सुरू होती आणि दोघांशिवाय अन्य कुणीही उपस्थित नव्हता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामांना वेग आला आहे. मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची निवडणूकही त्यात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारमध्येही मिंधे गटाच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. मिंधे सरकारच्या काळातील अनेक योजनांना त्यांनी स्थगिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची उचलबांगडीही एकापाठोपाठ एक सुरू आहे. दुसरीकडे मिंधे गटाच्या मंत्र्यांना निधी देताना उपमुख्यमंत्री अजित पवार हात आखडता घेत आहेत. त्यामुळे मंत्र्यांची नाराजी, आमदारांच्या नाराजीने एकनाथ शिंदे हैराण झाले आहेत. त्यातच आज फडणवीस-राज ठाकरे भेट झाल्यामुळे त्यांच्या टेन्शनमध्ये आणखीच भर पडली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जाते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलनही होत आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबईत भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसू शकतो याची जाणीव झाल्यामुळेच फडणवीस यांनी राज ठाकरे यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचेही म्हटले जात आहे. भेटीमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील मात्र बाहेर न आल्याने इतरही वेगवेगळे कयास लावले जात आहेत.