
मान्सूनपूर्व पावसाचा फटका, खतांच्या लिंकिंगमधून होणारी लूट, स्मार्ट मीटरची सक्ती, पीकविमा घोटाळा, वाढलेली महागाई यांमुळे राज्यातील शेतकरी व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यातच राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या तोंडाला लगाम नसल्याने ते बेताल वक्तव्ये करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हे सौरऊर्जेचे सोलर पॅनेल खपविण्यासाठी अदानीचे मार्केटिंग मॅनेजर झाल्याने शेतकरी मातीमोल झाला असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका, महापूर, मान्सूनपूर्व पाऊस, खताचे लिंकिंगमधून होणारी शेतकऱ्यांची लूट, स्मार्ट मीटरविरोधी जनआंदोलन, पीकविमा घोटाळा, कर्जमाफी, तसेच ऊसदराच्या पुढील आंदोलनाबाबतची दिशा ठरविण्यासंदर्भात शिरोळ येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
राजू शेट्टी म्हणाले, ‘राज्य सरकारकडून चळवळी मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जाती-धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडून सामान्य जनतेच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना आपल्या प्रश्नांची व अडचणींची जाणीव करून दिली पाहिजे.’
आंदोलनाचा राज्य सरकारने धसका घेतला आहे. राज्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी सातत्याने नजरकैदेत ठेवले जात आहे. राज्य सरकार शेती प्रश्न व महागाई कमी करण्याबाबत अपयशी ठरले आहे. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत ताकदीने निवडणूक लढविण्याच्या सूचना राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.