
रत्नागिरी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणाही कंत्राटी डॉक्टरांवर अवलंबून आहे. जिल्ह्यातील 67 प्राथमिक आरोग्य केंद्रात 106 कंत्राटी डॉक्टर आहेत. या डॉक्टरांना चार महिने पगार मिळालेला नाही. पगाराविना कंत्राटी डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य बिघडले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एमबीबीएस डॉक्टरांची 133 पदे मंजूर असून सध्या फक्त 23 एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहेत.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच कंत्राटी झाली आहे. 67 प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी बीएएमएस डॉक्टरांवर आहे. जिल्ह्यात 106 बीएएमएस डॉक्टर कंत्राटी पद्धतीने भरण्यात आले. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची भिस्त या एमबीबीएस डॉक्टरांवर टाकण्यात आली आहे. मात्र हे कंत्राटी डॉक्टर सेवेत रुजू झाल्यापासून त्यांना कधीही वेळेत पगार दिला नाही. जुलै महिन्यासह 106 कंत्राटी डॉक्टरांना चार महिने पगार मिळालेला नाही.
बीएएमएस डॉक्टरांची दरमहा चाळीस हजार रुपये मानधनावर कंत्राटी नेमणूक करण्यात आली आहे. डॉक्टरांना वेळेत पगार न मिळाल्याने अनेकांची आर्थिक गणिते कोलमडतात. कर्जाचा भार डोक्यावर असलेल्यांनी बॅंकाचे हफ्ते वेळेत कसे भरायचे? मुलांच्या शिक्षणाचा खर्च वेळेत कसा भागवायचा? हे प्रश्न या कंत्राटी डॉक्टरांसमोर भेडसावत आहेत. ही डॉक्टर मंडळी कोणतेही आंदोलन किंवा आवाज उठवू शकत नाहीत. त्यांना रूग्णसेवेचे व्रत करावेच लागते. याचा फायदा राज्यकर्ते घेत आहेत.