
मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपून काढले आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. पावस बाजारपेठेत पाणी शिरल्याने मोठा गोंधळ उडाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील पावस बाजारपेठेत पाणी भरले. पाणी भरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. हरचेरी बौद्धवाडी येथील रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. नंतर झाड तोडून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी 53.79 मिमी पाऊस पडला. मंडणगड – 31.75 मिमी, खेड – 48.57 मिमी, दापोली – 47.57 मिमी, चिपळूण – 25.56 मिमी, गुहागर – 22.80 मिमी संगमेश्वर – 51.91 मिमी, रत्नागिरी – 77.55 मिमी, लांजा 58.60 मिमी, राजापूर – 119.87 मिमी पाऊस पडला.