
गॅस टर्मिनलला परवानगी नसल्याचे सांगून मेरीटाईम बोर्डाने नांदिवडे येथील जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनलचे काम थांबवले होते. त्यानंतर जिंदाल कंपनीच्या अधिकाऱयांनी आज पुन्हा गॅस टर्मिनलचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. शासनाचा आदेश मोडून गॅस टर्मिनलचे सुरू केलेले काम ग्रामस्थांनी बंद पाडले. कंपनीच्या या दादागिरीविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱया जिंदाल कंपनीवर राज्य सरकार काय कारवाई करणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने गॅस टर्मिनलचे काम तत्काळ थांबवले आहे. तरीदेखील आज कंपनीच्या अधिकाऱयांनी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांचा विरोध असताना, शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी नसताना जिंदाल कंपनी मनमानी करून नांदिवडे गावातील लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. आधीच जिंदाल कंपनीच्या कोळशाची धूळ आणि राख यांचा स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे. आज नांदिवडे आणि जयगड परिसरामध्ये त्वचेचे आजार असलेले रुग्ण, श्वसनाचे आजार असलेले रुग्ण मोठय़ा प्रमाणात आहेत. एवढा त्रास असूनदेखील कंपनी गावामध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे असा आरोप माजी सरपंच गुरू सुर्वे यांनी केला आहे.
शासनाने या सर्व गोष्टींची दखल घेत लवकरात लवकर गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरित करावे. जिंदाल कंपनीवर कारवाई करावी, अशी सर्व शेतकरी आणि मच्छीमारांची मागणी आहे.