RCB for sale! आयपीएल 2025 चा विजेता बंगळुरुचा संघ खरंच विकणे आहे? युनायटेड स्पिरिटनं दिलं स्पष्टीकरण

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मिळवले. अंतिम लढतीत पंजाब किंग्जचा पराभव करत बंगळुरूने तब्बल 18 वर्षानंतर आयपीएल चषक उंचावला. या विजयानंतर आरसीबीच्या विक्रीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. आरसीबीची मालकी मॅकडोवल्स व्हिस्की तयार करणारी कंपनी युनायटेड स्पिरिट लि. कडे आहे आणि ही कंपनी आपली भागिदारी विकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली.

युनायटेड स्पिरिट लि. ही फरार उद्योजक विजय मल्ला याची कंपनी होती. मल्ल्या दिवाळखोरीत निघाला आणि त्याने ही कंपनी ब्रिटिश मद्य कंपनी डियाजियोला विकली. त्यामुळे डियाजियो कंपनी हिच आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मालक आहे. ही कंपनी आता आरसीबीतील आपली भागिदारी तब्बल 2 अब्ज डॉलर अर्थात 17 हजार कोटी रुपयांना विकणार असल्याचे समोर आले. या वृत्तामुळे युनायटेड स्पिरिट लि. कंपनीच्या शेअर्समध्येही मंगळवारी 3 टक्के वाढ झाली. त्यामुळे आयपीएल जिंकल्याचा फायदा उठवण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याची चर्चाही रंगली. मात्र, आता या चर्चा फक्त अफवा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले असून असा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे.

युनायटेड स्पिरिट लि. कंपनीने एक निवेदन जारी करत आरसीबीच्या विक्रीविषयी सुरू असल्याच्या वृत्तांचे खंडण केले आहे. याच संदर्भात बीएसई सर्व्हेलन्स डिपार्टमेंट आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने एक इमेल पाठवत कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्याला उत्तर देताना डियाजियोने म्हटले की, ’10 जून 2025 रोजी तुम्ही इमेल पाठवत आमच्याकडे आरसीबीतील भागिदारीच्या विक्रीसंदर्भात स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार, आम्ही हे स्पष्ट करतो ही आरसीबीच्या विक्रीच्या बातम्या तथ्यांवर आधारित नाहीत. आमचा असा कोणताही विचार नाही.’ यावरून युनायटेड स्पिरिट लि. कंपनीची पॅरेंट कंपनी डियाजियो आरसीबीतील भागिदारी विकण्याच्या तयारीत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Image

ललित मोदींची आरसीबी आणि सिद्धरामय्या सरकारवर टीका

दरम्यान, आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी बंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून आरसीबी फेंचायझी आणि कर्नाटक सरकावर सडकून टीका केली. ललित मोदी यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. तसेच ही घटना चुकीच्या आयोजनामुळे घडल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन व्यवस्थित करण्यात आले नव्हते. योग्य व्यवस्था नसताना कार्यक्रमाला परवानगी द्यायलाच नको होती, असेही ते म्हणाले.

बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी डीसीपींनी आधीच दिला होता इशारा, राज्य सरकारला पाठवले होते पत्र; नवीन खुलासा समोर