सणासुदीला कोकणात जाणाऱ्यांसाठी रो-रो सेवा,मालगाड्यांवरून खासगी वाहने नेता येणार; रेल्वेचा प्रस्ताव

सणासुदीच्या काळात कोकणात जाणाऱया चाकरमान्यांना महामार्गावरील वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यापासून सुटका म्हणून कोकण रेल्वे रो-रो सुरू करण्याच्या तयारीत असून यामुळे गाडय़ा आणि एसयूव्ही रेल्वेने गावी नेता येतील. यंदा गणपती उत्सवादरम्यान हा प्रयोग केला जाईल. त्यामुळे लवकरच कोकण रेल्वेने तुम्ही तुमच्या गाडीची वाहतूक करू शकाल. सध्या कोकण रेल्वे केवळ ट्रकची वाहतूक करते, मात्र यंदा प्रथमच कारसारखी वाहने रेल्वेने नेण्याची योजना कोकण रेल्वे आखत आहे.

रेल्वेने वाहने कोकणात नेणे ही एक उत्तम कल्पना असून आम्ही त्याचा विचार करत आहोत. आगामी काळात खासगी प्रवासी वाहनांनाही परवानगी देण्याचा विचार करू. अनेक गाडय़ा ट्रकसाठी डिझाइन केल्या असल्याने काही तांत्रिक बाबींवर पुनर्विचार करावा लागेल. यंदाच्या गणपतीत आम्ही हा प्रयोग करण्याच्या प्रयत्नात आहोत. रो-रो सेवेमुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लक्षणीय कमी होऊ शकते, असे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मान्सूनसाठी रेल्वेची तयारी

कमी दृश्यमानतेदरम्यान गाडीचा ताशी वेग 40 किमी असेल. पाऊस आणि धुक्याच्या ठिकाणी चांगल्या दृश्यमानतेसाठी एलईडी सिग्नल बसवण्यात आले आहेत.  माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उड्डपी या नऊ स्थानकांवर सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंचलित पर्जन्यमापक कार्यरत आहेत, तर काली, सावित्री आणि वशिष्ठाr नदीवरील पुलांवर नदी पूर इशारा प्रणाली वापरण्यात आली आहे. जेणेकरून नद्या आणि जलसाठय़ांच्या पाण्याच्या पातळीतील बदलाची माहिती मिळू शकेल.

कोकण रेल्वेची रो-रो सेवा

रेल्वे मालगाडय़ांवरून रो-रो सेवा सुरू झाल्यास कोकणवासीयांना त्यांच्या हलक्या वजनाच्या गाडय़ा गावाकडे नेण्यास मदत होईल. रो-रोच्या प्रवासादरम्यान चालक वैध तिकिटांसह प्रवास करू शकतो. कोकण रेल्वेची रो-रो ट्रेन संपूर्ण मार्गावर ट्रकची वाहतूक करते. गणपतीच्या हंगामात ही सेवा कारसारख्या इतर गाडय़ांसाठी विचारात घेतली जात आहे. आताच्या घडीला रो-रो ही सेवा फक्त कोलाड आणि मंगलोरदरम्यान चालते. लोडिंगसाठी वाहने कोलांडला आणावी लागतात. लोडिंग करण्यापूर्वी ट्रकची उंची आणि वजन तपासले जाते. किमान 40 ट्रकची एकावेळी वाहतूक होते. प्रत्येक ट्रकचा चालक आणि सफाई कर्मचारी प्रवास करतात. कार किंवा एसयूव्हीसाठी अशीच प्रक्रिया अवलंबली जाऊ शकते.

रस्त्यांची चाळण अन् मनस्ताप

दरवर्षी गणपतीला गावी जाताना रस्त्यांची चाळण ही चाकरमान्यांसमोर मोठी समस्या असते. स्वतःची गाडी असूनही रस्त्याची अवस्था आणि वाहतूककोंडीमुळे तासन्तास एकाच जागी थांबावे लागते. त्यामुळे कोकणी माणूस गावी जाण्यासाठी रेल्वेला पसंती देतो. कोकण रेल्वेने प्रवास केल्यानंतर स्थानकावर उतरून आपल्या गावी जाण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते, मात्र रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर स्वतःकडे वाहन असलेल्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

रो-रो, माल वाहतूक सेवेतून दुहेरी फायदा

कोकण रेल्वेला सर्वाधिक फायदा आणि रो-रो आणि मालवाहतूक सेवेतून होतो. आता हलक्या वाहनांनाही ही सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे गावी जाणाऱया प्रवाशांना फायदा होईल. शिवाय रेल्वेलाही आर्थिक मोठा फायदा होईल हे निश्चित. एकूणच कोकण रेल्वेला दुहेरी फायदा होणार आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात गावाकडे जात असताना खराब रस्ते आणि वाहतूककोंडीमुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रेल्वे मालगाडय़ांवरून कारची रो-रो सेवा सुरू झाल्यास कोकणवासीयांना त्यांच्या गाडय़ा घेऊन वेळेत गावी पोहोचता येईल.