
उरी, पठाणकोट, पुलवामा आणि पहलगामचे दहशतवादी हल्ले हे मोदी काळात झाले. या सर्व हल्ल्यांचे राजकारण करून भाजपने मते मागितली, पण जे हुतात्मा झाले त्यांना खरा न्याय कधीच मिळाला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावामागेही एक भावनिक राजकारण आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात ज्यांच्या कपाळावरचे सिंदूर पुसले, त्या लाडक्या बहिणींचा बदला पूर्ण झाला काय हे सायप्रस मुक्कामी शांती राग आळवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करायला हवे. कश्मीरात भाजपने राजकीय विचका केला व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा पचका केला. मोदी यांना सायप्रस देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तो गळ्यात घालून ते भारतात परत येतील तेव्हा 26 लाडक्या बहिणींच्या पुसल्या गेलेल्या सिंदूरची आठवण त्यांनी ठेवावी. सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता शांतीची कबुतरे सोडीत आहेत!
अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळून 241 प्रवासी ठार झाले. देश शोकसागरात बुडाला. इतकी दुःखद घटना देशात घडल्यावरदेखील पंतप्रधान मोदी हे सायप्रस वगैरे देशांत लगेच गेले व तेथील लोकांबरोबर सुहास्य वदनाने फोटो काढले. पंतप्रधान सायप्रसच्या निकोसिया प्रांतात गेले. तेथील राष्ट्रपतींनी मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस-3’ बहाल केला. देश दुःखात असताना मोदी पुन्हा विदेश दौऱ्यावर गेले. गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशात 2027 च्या निवडणूक प्रचाराच्या तयारीचा नारळ फोडायला पोहोचले. लखनऊला शहांनी शक्तिप्रदर्शन केले. पंतप्रधान मोदी कॅनडात ‘जी-7’ बैठकीलाही गेले, पण त्यांचे सायप्रसमधील वक्तव्य महत्त्वाचे आहे. सायप्रस मुक्कामी त्यांनी जागतिक शांततेचा राग आळवला. ‘‘युद्ध बरे नाही, ही युद्धाची वेळ नाही’’ असे ते म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले. मोदी यांच्या विचारात हा बदल नक्की कधी झाला? ते शांतिदूत कसे झाले? पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. पाकिस्तानला उद्ध्वस्त करू. पाकिस्तानचे चार तुकडे करू. पाकिस्तान म्हणजे हाती कटोरा घेतलेला एक भिकारडा, कंगाल देश असल्याचे मोदीभक्तांचे सांगणे होते. मोदी हे प्रत्यक्ष युद्धभूमीवरच उतरले असे चित्र निर्माण झाले, पण आता अचानक मोदी हे शांतीचे पुजारी बनून मौनात गेले. याचे श्रेय भाजपने प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांना द्यायला हवे. प्रे. ट्रम्प यांनी मोदींची हवाच काढली. पाकविरुद्ध सुरू असलेले दहशतवादाविरुद्धचे युद्धच प्रे. ट्रम्प यांनी थांबवले. तेव्हापासून मोदी हे ‘ओम शांती शांती’चा
मंत्र जपत
आहेत. युद्धाऐवजी बुद्धाची भाषा बोलू लागले आहेत. पहलगाम हल्ल्यास दोन महिने होत आले, पण 26 महिलांच्या कपाळावरचे ‘सिंदूर’ पुसणाऱ्या त्या चार अतिरेक्यांचा शोध मोदी-शहांचे सरकार अद्यापि लावू शकले नाही. या चार अतिरेक्यांना पकडून दिल्लीच्या इंडिया गेटसमोर गोळ्या घातल्याशिवाय पहलगामचा बदला पूर्ण होणार नाही. प्रे. ट्रम्प यांच्या दबावाखाली भारताने पाकिस्तानबरोबर युद्धबंदी केली व आता मोदी शांततेचा राग आळवीत आहेत. याचा भारतीय जनतेने काय अर्थ घ्यायचा? आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. ‘एफएटीएफ’ (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) या संस्थेने असे म्हटले आहे की, ‘‘आर्थिक पाठबळाशिवाय पहलगाममधील दहशतवादी हल्ला होणे शक्य नाही. सरकार पुरस्कृत दहशतवादाबरोबरच दहशतवाद्यांना अर्थसहाय्य करणारी प्रकरणे जाहीर करणारा अहवाल लवकरच प्रसिद्ध केला जाईल.’’ ‘एफएटीएफ’ ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ती जगभरात होणारे मनी लॉण्डरिंग आणि दहशतवाद्यांना होणारा आर्थिक पुरवठा यावर लक्ष ठेवते व त्याबाबत कारवाई करण्याचा प्रयत्न करते. या ‘एफएटीएफ’ने पहलगामवर सांगितले, ‘‘पैशांविना असा दहशतवादी हल्ला अशक्य आहे.’’ आता यात ‘एफएटीएफ’ने असा कोणता नवा शोध लावला? शेंबडे पोरही सांगेल की, पैशांशिवाय असे हल्ले शक्य नाहीत. कश्मीरातील दहशतवाद हा पैशांवरच पोसला गेलेला आहे. एखाद्यावर हल्ला, खून करण्यासाठी ज्या ‘सुपाऱ्या’ दिल्या जातात, त्यामागे अर्थकारण असते. भाजप पैशांचा वापर करून, अर्थपुरवठा करून ज्या प्रकारे आमदार, खासदार फोडते, त्याच पद्धतीने
पैशांचा वापर करून
अतिरेकी पोरांना हल्ले करायला पुढे केले जाते, पण या सगळ्याला जबाबदार इथले मोदींचे सरकार आहे. मोदींचे सरकार अपयशी ठरल्याने भारतीय हद्दीत अतिरेकी घुसले, त्यांनी हल्ला केला व गायब झाले. दहशतवाद्यांचा अर्थपुरवठा रोखण्यासाठी मोदींनी ‘नोटाबंदी’ची कुऱ्हाड चालवली. त्यात सामान्य जनता भरडली गेली. अतिरेक्यांच्या कारवाया काही थांबल्या नाहीत. दहशतवाद्यांना अर्थपुरवठा होत असेल व त्यातून हल्ले वाढले असतील तर त्याला जबाबदार आपले गृहमंत्रालय आहे. मनी लॉण्डरिंग प्रकरणात भाजप विरोधकांवर कारवाया झाल्या, पण दहशतवादी मोकाट आहेत. ‘एफएटीएफ’साठी हासुद्धा तपासाचा धागा असायला हवा. भारतात दहशतवादी हल्ले, अपघात, मृत्यू यांचे राजकारण केले जाते. उरी, पठाणकोट, पुलवामा आणि पहलगामचे दहशतवादी हल्ले हे मोदी काळात झाले. या सर्व हल्ल्यांचे राजकारण करून भाजपने मते मागितली, पण जे हुतात्मा झाले त्यांना खरा न्याय कधीच मिळाला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावामागेही एक भावनिक राजकारण आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात ज्यांच्या कपाळावरचे सिंदूर पुसले, त्या लाडक्या बहिणींचा बदला पूर्ण झाला काय हे सायप्रस मुक्कामी शांती राग आळवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करायला हवे. कश्मीरात भाजपने राजकीय विचका केला व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा पचका केला. मोदी यांना सायप्रस देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तो गळ्यात घालून ते भारतात परत येतील तेव्हा 26 लाडक्या बहिणींच्या पुसल्या गेलेल्या सिंदूरची आठवण त्यांनी ठेवावी. सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता शांतीची कबुतरे सोडीत आहेत!