सामना अग्रलेख – मराठी माणसा, जागा आहेस ना?

महाराष्ट्रात मराठी माणसाच्या राजकारणाची शोकांतिका करण्याचे प्रयत्न हर तऱ्हेने केले जात आहेत. मात्र उद्धव आणि राज यांच्या एकीच्या प्रयोगाने पुन्हा एकदा बाळासाहेबांचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. शिवतीर्थावर विसावलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसालाएकीचा संदेश दिला. ती एकी हीच हिंदुहृदयसम्राटांना खरी मानवंदना ठरेल. मुंबईमहाराष्ट्रात मराठी एकजुटीचाच विजय होईल. बाळासाहेब ठाकरे हे भारतीय राजकारणातले असामान्य पुरुष होते. या पुरुष सिंहाने देशाच्या राजकारणातले महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी माणूस हा जगात कोठेही गेला तरीमराठीम्हणून त्याच्यातला आत्मविश्वास बाळासाहेब ठाकरे यांनी जागा केला. त्याच मराठी माणसाला बाळासाहेब आज विचारीत आहेत, ‘‘जय महाराष्ट्र! मराठी माणसा, जागा आहेस ना? झोपलास तर संपलास! जागा रहा!’’

भारतात एकंदरीत जे अराजक माजले आहे ते पाहता देशाच्या कोट्यवधी जनतेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण रोजच येत आहे. बिहारच्या विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘जो जिता वोही सिकंदर.’’ आज बाळासाहेब असते तर त्यांनी ‘‘कोण हा सिकंदर? तो नव्या हिंदुत्ववाल्यांचा नवा बाप आहे काय? महाराष्ट्राचा, देशाचा बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सिकंदर फार तर भाजपचा बाप असेल,’’ अशा शब्दांत खिल्ली उडवली असती. मोदी-शहा यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांना बिहारमध्ये महिलांची मते विकत घेतली. महाराष्ट्रात ही मते फक्त दीड हजारात विकत घेतली व ‘जीतं मय्या’चे ढोल हे लोक हिंदुत्वाच्या नावाने पिटत आहेत. हिंदुहृदयसम्राटांना मान्य होणारे हिंदुत्व हे नाहीच. बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व काय व कसे होते ते जम्मू-कश्मीरच्या ‘पंडितां’च्या अंतरंगात जाऊन पाहायला हवे. गृहमंत्री शहा म्हणतात, ‘‘आम्ही दहशतवाद संपवत कश्मीरचा प्रश्न मिटवला.’’ त्यांचे शब्द तोंडातून बाहेर पडत असतानाच श्रीनगरच्या पोलीस स्टेशनात बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी नऊ जणांचे बळी घेतले. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून 15 जणांचे प्राण घेतले. त्याआधी पुलवामा, पहलगाम घडले. कश्मीरात हिंदू पंडितांची घरवापसी झाली नाही. पंडित मंडळी रोज हिंदुहृदयसम्राटांच्या नावाने धावा करत आहेत. हिंदू पंडितांचे एकमेव तारणहार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे हिंदू पंडितांचे चिलखत होते. अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवी यात्रा सुरळीत पार पाडाव्यात व हिंदूंच्या केसालाही धक्का लागू नये म्हणून हिंदूंचे सम्राट बाळासाहेब ठाकरे हे पाकड्या दहशतवाद्यांना अंगावर घेऊन त्यांना नामोहरम करत होते. त्यांच्या

हिंदू प्रेमात

ढोंग नव्हते. त्यांच्या हिंदू सेवेत स्वार्थ नव्हता. त्यांच्या राष्ट्रसेवेत भेसळ नव्हती. त्यांनी हिंदू महिलांना दहा हजारांचे आमिष दाखवून मते विकत घेतली नाहीत. ते निःस्वार्थी मनाने हिंदू व राष्ट्रसेवा करत राहिले. बाळासाहेबांचे सामाजिक विचार प्रगतीकारक होते. वडील प्रबोधनकारांप्रमाणे ते समाज सुधारक होते. महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा शिवसेनाप्रमुखांना जाज्वल्य अभिमान होता. महाराष्ट्राचा सर्व व्यवहार मराठी भाषेत असावा, महाराष्ट्रातील शिक्षणाचे माध्यमही मराठी असावे असे त्यांचे मत होते. हिंदुस्थानात भाषावार प्रांतरचनेनुसार जी राज्ये निर्माण झाली, त्यामुळे त्या त्या भाषेचा मान राखावा, याच धोरणानुसार महाराष्ट्रात मराठी भाषा व मराठी माणसांचा सन्मान राहायलाच हवा ही त्यांची ठाम भूमिका होती. मराठीच्या आड येणाऱ्या महाराष्ट्राच्या दुश्मनांना त्यांनी भर मैदानात लोळवून नामोहरम केले. आज मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या अस्तित्वाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सध्याच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केले. मुंबईच्या जमीनजुमल्यांवर परप्रांतीयांनी ताबा मिळवून महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसालाच ‘उपरा’ बनवले आहे. बाळासाहेबांनी 55 वर्षांपूर्वी शिवसेनारूपी स्वाभिमानाची ठिणगी टाकून देशभरात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा वणवा पेटवला होता. ‘ऊठ मराठ्या ऊठ…’ असा तेजस्वी मंत्र देऊन मराठी मने पेटवली होती. जोपर्यंत ही मराठी मने धगधगत आहेत तोपर्यंत मुंबईचे रक्षण होईल. मोदी-शहांच्या सत्ताधारी अवलादीने मुंबई-मराठी माणसाचा स्वाभिमान नष्ट केला व त्यासाठी शिवसेना निस्तेज केली. बाळासाहेबांच्या नंतर महाराष्ट्र मरून पडावा व मराठी माणसाने गुलामीचे जिणे जगावे यासाठी त्यांनी मुंबईवर बिल्डरांचे राज्य लादले. छत्रपती शिवाजीराजांनी

शाईस्तेखानाची बोटे

छाटली, अफझलखानाचा कोथळा काढला, शिवरायांनी ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देणाऱ्या व्यापाऱ्यांवर हल्ला करून सुरत लुटली, ज्या महाराष्ट्राने देशाला लढायला शिकवले तोच महाराष्ट्र आज सुरतप्रमाणे लुटला जात आहे व स्वतःस मराठी म्हणवून घेणारे लाचार अंधभक्त मोदी-शहा-अदानीचे भजन करीत आहेत. आज बाळासाहेब असते तर या सगळ्यांच्या पाठीत हंटरचे फटके बसले असते. देशात न्यायालये, लोकशाही, निवडणूक म्हणजे एक तमाशा बनला आहे. लोकशाहीत जनादेशाला महत्त्व आहे. आज फक्त निवडणूक आयोगाच्या आदेशाने जय-विजय, पराजय ठरतात. देशातील विरोधकांचे सर्व आवाज दडपले जात असताना जनतेला एकच आवाज आठवतोय तो म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. त्यांनी कधी तमाम हिंदूंना साद घातली, तर कधी शिवतीर्थावरून तमाम मराठी माणसाला साद घालून एकत्र केले. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या राजकारणाची शोकांतिका करण्याचे प्रयत्न हर तऱ्हेने केले जात आहेत. मात्र उद्धव आणि राज यांच्या एकीच्या प्रयोगाने पुन्हा एकदा बाळासाहेबांचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. शिवतीर्थावर विसावलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाला ‘एकी’चा संदेश दिला. ती एकी हीच हिंदुहृदयसम्राटांना खरी मानवंदना ठरेल. मुंबई-महाराष्ट्रात मराठी एकजुटीचाच विजय होईल. मराठी माणसांच्या मनगटातल्या छत्रपती शिवरायांचाच विजय होईल. बाळासाहेब ठाकरे हे भारतीय राजकारणातले असामान्य पुरुष होते. या पुरुष सिंहाने देशाच्या राजकारणातले महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी माणूस हा जगात कोठेही गेला तरी ‘मराठी’ म्हणून त्याच्यातला आत्मविश्वास बाळासाहेब ठाकरे यांनी जागा केला. त्याच मराठी माणसाला बाळासाहेब आज विचारीत आहेत, ‘‘जय महाराष्ट्र! मराठी माणसा, जागा आहेस ना? झोपलास तर संपलास! जागा रहा!’’