मुंबई-पुणे महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना

Safety measures on Mumbai-Pune highway

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि हायवेज इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टच्या सहकार्याने सेव्हलाइफ फाऊंडेशनतर्फे रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पंधरा अतिजोखमीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजान राबवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी महामार्गावरील या जोखमीच्या ठिकाणी झालेल्या अपघातात 88 जणांना जीव गमावला होता.

सेव्हलाइफच्या झीरो फॅटॅलिटी कॉरिडॉर कार्यक्रमाचा भाग असलेल्या या उपक्रमात अपघात आणि मृत्यूची मूळ कारणे हाताळण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी क्षेत्रीय सर्वेक्षण आणि डेटा विश्लेषण करून रस्त्यांच्या स्थितीचे तपशीलवार मूल्यांकन करण्यात आले. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरणारी ठिकाणे ओळखण्यास मदत झाली. या ठिकाणी सूचनाफलक, वेगावर नियंत्रण आणणाऱया उपाययोजना, सुधारित दृश्यमानता, पादचाऱयांसाठी पायाभूत सुविधा आणि जंक्शन्सची पुनर्निमिती यासारख्या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत.

राज्यात गेल्यावर्षी रस्ते अपघातात पंधरा हजाराहून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. यातील बहुतांश अपघात हे महामार्गांवर झालेले आहेत. त्यामुळे महामार्गावरी अपघात रोखण्यासाठी हायवेज इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील धोकादायक ठिकाणे असेलल्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबवण्यासाठी सेव्हलाइफ फाऊंडेशनसोबत भागीदारी केली आहे. या भागिदारीच्या माध्यमातून अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे हायवेज इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टचे जॉइंट सीईओ डॉ. जफर खान यांनी सांगितले.