
‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या संपल्या आहेत. तीनदा पुस्तक छापावे लागले आहे. 10 दिवसांमध्ये पुस्तक तीन वेळा छापावे लागले हा मराठी पुस्तकांच्या बाबतीत विक्रमी प्रसंग आहे. अमेझॉनवर पहिल्या क्रमांकावर चाललेले पुस्तक असून अजूनही देशातून, महाराष्ट्रातून याची मागणी होत आहे. या पुस्तकाचे इंग्रजी अनुकरण जुलै महिन्यात दिल्लीत प्रसिद्ध होईल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होईल, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. ते गुरुवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे पुस्तक कुणा कुणाला पाठवले हे देखील सांगितले.
महाराष्ट्रामध्ये ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे. अनेकांना या पुस्तकाच्या प्रति पाठवल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना व्यक्तिगत पत्र लिहून हे पुस्तक पाठवले आहे. एकनाथ शिंदे यांनाही हे पुस्तक पाठवले आहे. माणसाने संकट काळात पळून न जाता कसे आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि लढायला पाहिजे हे त्यांनी यातून शिकावे. देवेंद्र फडणवीस यांनाही हे बालसाहित्य पाठवले आहे. जे ईडीला घाबरून भाजप, शिंदे गटात किंवा अजित पवारांकडे गेलेले आहेत अशा सगळ्यांना हे पुस्तक पाठवलेले आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, दिल्लीत गेल्यावर हे पुस्तक प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देता येईल याचीही व्यवस्था करू. त्यांच्यासाठीच हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये करतोय. या पुस्तकाचा जो गाभा आहे, आत्मा आहे तो देशात पोहोचला पाहिजे. याचे कारण असे आहे की, ज्या पद्धतीने सगळ्या विरोधकांवर जुलूम केला गेला आणि त्यातले काही लोक आमच्यासारखे उभे राहिले. मी, दिल्लीत संजय सिंह, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना फार त्रास दिला हे जनतेला कळायला पाहिजे. इतके सगळे घाव झेलूनही आम्ही आजही आमच्या भूमिकेवर ठामपणे उभे आहोत.
दरम्यान, एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणामध्ये नीतिमुल्ल्यांचे अवमूल्यन चिंताजनक असल्याचे म्हटले. फडणवीसांना नीतिमुल्ल्यांच्या अवमूल्यनाची चिंता वाटते हे वाचून बरे वाटले. ज्यांचे दाऊद इब्राहिम सोबत संबंध आहेत, ज्यांनी भ्रष्ट मार्गाने संपत्ती गोळा केली, ज्यांना मोदी, शहा, फडणवीस यांनी तुरुंगात टाकले हे सगळे लोक आज त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांना रंग सफेदी करण्यासाठी फडणवीस म्हणतात की, नितीमुल्ल्यांच्या घसरणीची मला चिंता वाटते. चिंता वाटते मग ती मूल्य तुम्ही जपली का नाही? सत्तेसाठी तुम्ही स्वत:ला इतक्या खालच्या स्तरावरती का नेले? असा सवाल राऊत यांनी केला.
सत्तेची तहान लागल्यावर कुणी गटारातलं किंवा गढूळ पाणी पित नाही; संजय राऊत स्पष्टच बोलले
दुसरे म्हणजे, 2019 ला उद्धव ठाकरेंनी दगा दिला हे पूर्णपणे चूक आहे. दगा भारतीय जनता पक्षाने दिला. शेवटपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता. पण त्यांनी चर्चेची दरवाजे बंद केले. त्यांना आमच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या हे खरे आहे. आमच्या जागा त्यांनी पाडल्या हे ही खरे आहे. पॉवर शेअरिंग 50-50 चा अर्थ त्यांनी महाराष्ट्राला समजून सांगावा. सत्तेचे वाटप समसमान होईल. आता सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद नाही असे त्यांनी सांगितले होते का? मुख्यमंत्रीपद म्हणजे काय धर्मादाय पद नाही. सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपदही आहे. बरं, मग तेच मुख्यमंत्रीपद शिंदेला कसे दिले? तुम्हाला शिवसेनेला द्यायचे नव्हते, पण शिवसेनेतील फुटलेल्या गटाला दिले. तुम्ही तेव्हा उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हते, आमच्या धोरणात बसत नाही सांगितले. आज तुमच्याकडे दोन-दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि भुजबळांच्या नावाचातिसरे उपमुख्यमंत्री म्हणून विचार सुरू आहे, हे चालते का? तुम्ही दगा देण्याच्या विचारानेच ते राजकारण करत होते. शिवसेनेला दगा द्यायचा, भविष्यात तुकडे करायचे, त्यानुसार तुमची आखणी आणि मांडणी सुरू होती, असेही राऊत म्हणाले.