“मोदी-शहांच्या दुकानाबरोबर आपलं छोटं दुकान चालवायचंय म्हणून…”, तटकरे, प्रफुल्ल पटेलांचं नाव घेत संजय राऊतांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यावर चर्चा सुरू असून शरद पवार यांनी हा निर्णय नव्या पिढीकडे सोपवला आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटातून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा या एकत्रि‍करणाला विरोध आहे. दोन गट एकत्र आले तर तटकरे आणि पटेल यांना त्यांचे राजकीय महत्त्व कमी होऊ शकते अशी भीती आहे. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी यावर जळजळीत प्रतिक्रिया दिली.

माध्यम प्रतिनिधींनी याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, आता यात विरोधाभास कसा आहे बघा. आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत सांगतात. शरद पवार यांच्या विचारधारेवर आमचा पक्ष उभा आहे असे म्हणतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असेही सांगता. आपण एकत्र आलो पाहिजे असेही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाहीत. म्हणजे त्यांना मोदी, शहांच्या दुकानाबरोबर आपले छोटे दुकान चालवायचे आहे. शेवटी जो-तो आपापला राजकीय फायदा, तोटा त्यात पाहत असतो.

ते पुढे म्हणाले की, प्रफुल्ल पटेल हे काही महान नेते नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. तर सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे अध्यक्ष आहेत. उद्या हा पक्ष विलिन झाला, तो होणार नाही अशी माझी माहिती. पण झालाच तर अध्यक्ष बदलावा लागेल. मग तटकरेंनी काय करायचे? केंद्रातील मंत्रि‍पदांचाही प्रश्न निर्माण होईल. प्रत्येक जण आपली व्यवस्था, सोय, फायदा राजकारणात पाहतो.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही भडणवीस यांचे कौतुक केले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत. फडणवीस, शिंदे यांच्या कौतुकाने पवार मोठे होत नाहीत. ते मोठेच आहेत. पहाड आहेत, सह्याद्री आहेत. फडणवीस कौतुक करताहेत किंवा अजून कुणी कौतुक करताहेत म्हणून त्याच्यामुळे त्यांची उंची वाढत नाही. ते टोलेजंग व्यक्तीमत्वच आहे.

संवादाचा अभाव म्हणजे सर्वकाही आलबेल नाही, फडणवीसांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा

महिला आयोगावर राजकीय व्यक्ती नको

केंद्रातील आणि राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अराजकीय व्यक्ती असायला पाहिजे. राजकारणातील सोय म्हणून कुणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास मंडळ नाही. हे एक घटनात्मक पद आहे. त्याच्यामुळे देशातील, राज्यातील महिलांवरच्या अत्याचारांना, अन्यायांना वाचा फुटते. पण नेत्याच्या जवळच्या महिलेला राजकीय सोय म्हणून त्या पदावर बसवले जाते आणि कॅबिनेट दर्जा देतो. अराजकीय व्यक्ती महिला त्या पदावर पाहिजे आणि सदस्यही तसेच पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

…तरी आश्चर्य वाटणार नाही

बीएमसीला बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरकडून 14 हजार कोटी येणे बाकी आहे. यातील काही टक्के नक्कीच मागच्या दाराने निवडणुकीसाठी वसूल केले असतील. हे राज्य ठेकेदारांचे आणि मुंबईत ठेकेदारांचे राज्य सुरू आहे. त्यामुळे उद्या 14 हजार कोटी माफ झाले आणि त्या बदल्यात 5-10 हजार कोटी निवडणूक फंडात गेले किंवा नगरसेवक विकत घेण्यासाठी वापरले तरी आश्चर्य वाटणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

शिंदे व ‘सुरत-गुवाहाटी’ला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळींनी…! संजय राऊत यांचा चिमटा, एकनाथ शिंदेंना पाठवली पुस्तकाची प्रत