
पहलगाम हल्ला, कश्मीरमधील दहशतवाद आणि दहशतवादाविरोधात हिंदुस्थानने राबवलेले ऑपरेशन सिंदूर याबाबत माहिती देण्यासाठी मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प हे आपणच युद्ध थांबवायला सांगितले, असा डांगोरा पिटत आहे, याबाबत मोदी सरकारने माहिती द्यावी, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत विशेष अधिवेशनाची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच ते त्यांच्या भूमिकवेर ठाम आहेत. त्यांच्या या भूमिकेबाबत राष्ट्रवादीच्या मासिकात उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.
ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती मिळण्याकरता सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येतेय. मात्र, अशा विशेष अधिवेशनाची गरज नाही. विशेष अधिवेशनाला माझा विरोध नाही. पण हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने त्यावर खुली चचर्चा होऊ शकत नाही. याच्या आधी एक दोनवेळा असे प्रकार झाले आहेत. त्यावेळी संरक्षणमंत्र्यांनी मला आणि काही लोकांना बोलावलं, काय प्रकार झाला याची माहिती दिली. कारण, त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. नेमकं काय घडलंय हे सरकारने विशेष अधिवेशनात सांगावं, अशी सर्वांच अपेक्षा असणार. पण याबाबतीत बोलण्यावर मर्यादा येतील विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही. पण त्यापेक्षा दहा- वीस लोकांना बोलावून यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं पाहिजे काय स्थिती आहे, आपण काय केले आहे याची माहिती दिली पाहिजे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.