
आऊटगोईंग वगैरे शब्द बंद करा. पैशाच्या जोरावर दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडण्याला आऊटगोईंग, इनकमिंग या शब्दांच्या उपमा देऊ नका. ईडी, सीबीआय, पोलीस दोन तास आमच्याकडे आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपातील 90 टक्के लोकांचे आऊटगोईंग होईल. त्यामुळे याला फार मोठे वैचारिक पक्षांतर असे म्हणणे पूर्णपणए चुकीचे आहे. कुणाला जायचे, कुणाला थांबायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण पक्षात राहून पक्षविरोधी कारवाई कराल तर कारवाई केली जाईल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत गुरुवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे, ज्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत ती शिवसेना कोणत्याही प्रकारचा दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. शिवसेना हा देशातील राजकारणातील सगळ्यात जुना पक्ष आहे. भलेही अमित शहांनी त्यांचा कंडू शमवण्यासाठी, महाराष्ट्रावर त्यांना जो सूड घ्यायचा आहे त्यासाठी हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, तरी मूळ पक्ष मूळ पक्षच आहे. भविष्यात शिवसेना काय आहे हे अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनाही समजेल. तेव्हा इनकमिंग, आऊटगोईँग किंवा अजून काही ज्या शब्दाचा तुम्हाला वापर करायचा आहे तो जपून करा. पक्षांतर्गत कोणतेही हेवेदावे, ब्लॅकमेलिंग, दबाव हे शिवसेना पक्षप्रमुख स्वीकारणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.
ते पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई कधीही चुकीची नसते. त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो. आपापसात चर्चा केली जाते. स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतर अशा प्रकारची कारवाई केली जाते. चुकीच्या कारवाया आमच्याकडून होत नाही. मी म्हणजे पक्ष, माझ्यामुळे पक्ष, मी सांगेन तोच पक्ष हे धोरण शिवसेनेत कधीच राबवले गेले नाही.
फोडाफोडीच्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, शिंदेंच्या पक्षाला काही काम नाही. ते नाराज असून नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जडलेला आहे. तो काही दूर होत नाही. ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले आहेत. ही नाराज सेना असून याला घेतले, त्याला घेतले या पलीकडे महाराष्ट्र हिताचे, जनतेच्या हिताचे किंवा राष्ट्रहिताची कुठली भूमिका आतापर्यंत मांडली आहे? नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी देशामध्ये अराजक राबवले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे की अराजक माजेल, आणि त्याची सुरुवात मोदी, शहांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. मिंधेही त्या अराजकात सहभागी झाले आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.
चार नवीन ‘उपनेते’ नियुक्त; गुलाबराव वाघ, दत्ता गायकवाड, बाळ माने, सचिन घायाळ यांना संधी