क्या हुआ तेरा वादा? छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोलीत शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा; आंदोलनाचा समारोप चक्का जामने होणार

निवडणुकीपुरती आश्वासने देऊन सत्ता मिळताच जनतेला वाऱयावर सोडणाऱया महायुतीला ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा खणखणीत सवाल करत शिवसेनेच्या वतीने नांदेड, हिंगोली तसेच छत्रपती संभाजीनगरात बुधवारी दणदणीत ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱयांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार, असा जाब विचारण्यात आला.

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या वतीने आश्वासनांची खैरातच वाटण्यात आली होती. मात्र सत्ता मिळाल्यानंतर महायुती सरकारला या आश्वासनांचा विसर पडला. दिलेला कोणताही शब्द पाळण्यात आला नाही. महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने 9 जूनपासून ‘क्या हुआ तेरा वादा?’ हे अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज मराठवाडय़ात छत्रपती संभाजीनगर, नांदेड तसेच हिंगोलीत ट्रक्टर तसेच बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्तालयावर ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला. ‘महायुती सरकार हाय हाय, महायुती सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’, ‘शेतकऱयांची फसवणूक करणाऱया सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

नांदेड जिल्हय़ात किनवट, भोकर, मुदखेड, मुखेड, अर्धापूर येथे  ट्रक्टर तसेच बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. किनवट येथे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चात शिवसैनिक, शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱयांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. हिंगोली जिल्हय़ात कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ आणि वसमत येथे ट्रक्टर तसेच बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

‘क्या हुआ तेरा वादा’ या आंदोलनाचा समारोप जिल्हा स्तरावर चक्काजाम आंदोलन करून होणार आहे. या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना तसेच शेतकरी, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.