अजित पवार गट, मिंधे गट हे फक्त बुडबुडे, ते लवकरच फुटतील; संजय राऊत यांचा घणाघात

अजित पवार गट, मिंधे गट हे फक्त बुडबुडे आहेत. हे बुडबुडे लवकरच फुटतील. तसेच मोदी, शहा यांच्या भअरमाचे भओपळे रोज फुटत आहेत. तसेच आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत, असा काही जणांचा भ्रम आहे. मात्र, महाराष्ट्रद्रोह्यांचे बूट चाटणे, हे बाळासाहेबांचे विचार नाहीत, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांना चांगलेच फटकारले.

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मिंधे यांनी कधी आत्मसात केले? ते कोणत्या काळात बाळासाहेबांसोबत होते? काहीजण स्वतःबाबत गैरसमज बाळागतात. त्यातील तो एक भ्रम आहे. महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या मोदी, शहा, फडणवीस यांचे बूट चाटणे हा बाळासाहेबांचा विचार कधीही असून शकत नाही. महाराष्ट्र, मुंबईची लूट सुरू असताना मराठी माणसाची गळचेपी होत असताना ते महाराष्ट्रद्रोह्यांचे बूट चाटत असतील, तर त्यावर काही बोलण्याची गरज नाही, असे संजय राऊत म्हणाले.

सध्या ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणा यांच्या हातात सर्व सूत्रे आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखामुळे फडणवीसांपासून मोदीपर्यंत सर्वांना मिरच्या झोंबल्या आहेत. तपास यंत्रणाचा कसा गैरवापर होत आहे, ते त्यांनी मांडले आहे. पक्ष फोडून, आमदार, खासदार विकत घेत, तपास यंत्रणांचा गैरवापर, पैशांचा गैरवापर करत त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. अजित पवार यांचा गट, मिंधे यांचा गट हे बुडबुडे आहेत. हे बुडबुडे लवकरच फुटतील. तसेच मोदी आणि शहा यांच्या भ्रमाचा भोपळा रोज फुटत आहे. मात्र, आम्ही या परिस्थितीवर मात करत पुन्हा उभे राहू हा विश्वास आम्हांला आहे, असेही ते म्हणाले.

काही माणसं पक्की असतात, तर काही कच्ची मडकी असतात. पक्क्या माणसांपैकी नाशिकमधील विलास शिंदे आहेत. तर चंद्रहार पाटील यांच्यासारखी काही कच्ची मडकी आहेत. त्यांच्यासाठी आम्ही प्रतिष्ठेचा विषय केला. त्यांच्यासाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, स्वार्थासाठी, लाभासाठी बेईमानी करावी, त्याला आम्ही काय कमी दिले. त्यांच्या विट्यात त्यांना मतं मिळाली नाही. ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली, त्यांनी बेईमानी करावी, याचे वाईट वाटते, असे संजय राऊत म्हणाले.