
सामान्य मुंबईकर बुलेट ट्रेन, एसी ट्रेनने प्रवास करत नाही. सामान्य मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र, काही मूठभर धनिकांसाठी एसी ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या, त्यामुळे लोकल फेऱ्या कमी झाल्याने गर्दी वाढली आणि सोमवारी मुंब्रा-दिवा स्थानकात अपघात घडला. हा अपघात म्हणजे बुलेट ट्रेनचे बळी आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.
मुंबईत रेल्वे अपघातातील बळी हे बुलेट ट्रेनचे बळी आहेत. मुंबईचा गुजरात करण्याचे मोदी, शहा, फडणवीस यांचे स्वप्न आहे. त्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घालण्यात येत आहे. मात्र, सामान्य मुंबईकर बुलेट ट्रेन, एसी ट्रेनने प्रवास करत नाही. काही मूठभर लोकांसाठी एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या कमी झाल्या. त्यामुळे गर्दी वाढली आणि कालचा अपघात झाला. बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन ही गुजरातची सोय आहे. मुंबईसाठी लोकल ट्रेन वाढणे आणि सुविधा देणे गरजेचे आहे. याबाबत कोणाही बोलत नाही. मात्र, मुंबईकरांसाठी आम्ही सातत्याने भूमिका मांडत आहोत, असेही ते म्हणाले.
आता मुलुंडचे नागडे पोपटलाल कुठे गेले, फुटपट्ट्या घेत फिरणारे आता ते कुठे आहेत, या मोठ्या अपघाताबाबत ते काहीही बोलले नाही. त्यांनी रेल्वेमंत्र्यांचा राजीनामाही मागितला नाही. आता मुंबईकरांसाठी ते का बोलत नाही. हे सर्व गौतम अदानीचे चमचे आहेत. त्यांना मराठी माणसाची मुंबई विकायची आहे, ते आम्ही कधीही होऊ देणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.