अमित शहा हे त्यांचे प्रमुख असल्याने मिंधेंचे नेते त्यांचीच भाषा बोलतात; संजय राऊत यांचा टोला

राज्यात 27 महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यात महाविकास आघाडी बळकट असून आम्ही एकत्रित काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आता निवडणुकांसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांना काय झाले, यात न पडता, येणाऱ्या महापालिका निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढायची आहे. आमचे संघटन मजबूत आहे. विधानसभा निवडणुका त्यांनी कशा जिंकल्या, हे सर्व जगाला समजले आहे. त्यांना लोकशाही मार्गाने विजय मिळाला नाही, त्यांनी निवडणुका जिंकल्या यावर त्यांचा स्वतःचा आणि जनतेचाही विश्वास नाही. त्यामुळे याआधी काय झाले, याचा विचार करण्याऐवजी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी आम्ही सुरू केली आहे.

शिवसेनेसाठी आव्हाने ही नवी गोष्ट नाही. शिवसेनेच्या स्थापनेपासून आम्ही अनेक आव्हानांचा सामना केला आहे. फक्त निवडणुका लढणे आणि जिंकणे हेच राजकीय पक्षांचे उद्दीष्ट्य नसते. संघटनेच्या माध्यमातून जनतेची ,राज्याची सेवा करणे हाच आमच्या संघटनेचा आत्मा आहे. निवडणुका येतात आणि जातात. मात्र, जे कार्य हातात घेतले आहे, ते सोडायचे नाही. भाजप आणि मित्रपक्ष नेहमी निवडणुकीच्याच विचारात असतात. पंतप्रधान मोदी यांना देशात काय सुरू आहे, याची माहिती नाही. मात्र, सिंदूर यात्रा, ही यात्रा करत ते त्यांचा प्रचार करत आहेत.असे काम शिवसेना कधीही करणार नाही.आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

जळगाव जिल्ह्याला पालकमंत्री असताना जिल्ह्याची परिस्थिती बिकट झाली आहे. महिलांची रस्त्यावर प्रसूती होत आहे. रुग्णवाहिका मिळत नाही, उपचार मिळत नाही इतकी बिकट परिस्थिती असताना ते मंत्री म्हणून मिरवत आहेत. हे राज्याचे तोंड काळे करण्यासारखेच आहे. मात्र, यावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. या सर्व गोष्टींकडे आम्ही संवेदनशीलतेने बघत आहोत, असेही ते म्हणाले.

हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे, असे विधान मिंधे गटातील एका नेत्याने केले आहे. त्याचाही संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला महाराष्ट्रात स्वाभिमानाने जगता यावे, मराठी माणसाला आणि मराठीला सन्मान मिळावा, यासाठी शिवसेनेची स्थापना केली. आता स्वतःला बाळासाहेब यांचे वारसदार म्हणवणारे मराठीबाबत काय भूमिका मांडत आहेत, ती त्यांची भूमिका नसून भाजप आणि अमित शहा यांची भूमिका आहे. त्यांचे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आहेत, त्यामुळे अमित शहा यांना जे हवे आहे, तेच हे लोकं बोलतात, अशा शब्दांत त्यांनी मिंधे गटातील नेत्यांना टोला लगावला.

राज्यातील 27 महापालिकांमध्ये निवडणुकांमध्ये निवडणुका लढायच्या आहेत, काही ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे, काही ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षाची ताकद आहे तर काही ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मजबूत आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार आहोत. या सरकारने जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करत मते मिळवली आहेत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र, आता अजित पवार म्हणतात, अशी घोषणा आपण केली नाही, असे सांगत ते हात झटकत आहेत. मात्र, आता ठोस भूमिका घ्यावी लागेल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे त्यांचे आश्वासन कागदावरच आहे. आता ते 500 रुपयांपर्यंत आले आहेत. उद्या फूल आणि फुलाची पाकळी म्हणून सव्वाअकरा रुपये बहिणींना देतील, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.