
लग्नसराईची धूम सुरू झाली आहे. देशभरात बँड, बाजा, बारात जोरात सुरू आहे. लग्न पहावे करून असे उगीच म्हटले जात नाही. लग्नसोहळा संस्मरणीय व्हावा म्हणून प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतो. यंदा 1 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत साडेसहा लाख कोटी रुपये विवाह सोहळ्यावर खर्च होतील, असा अंदाज ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने वर्तविला आहे.
वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीमुळे नवरात्र ते दिवाळीपर्यंत सुरू असलेल्या महोत्सवातील उलाढालीचा प्रभाव कायम असतानाच आता लगीनसराईतही हा ट्रेंड कायम राहील. येत्या 14 डिसेंबरपर्यंत देशात 46 लाख विवाह संपन्न होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे साडी ते सॅलॉन अशा सर्वच क्षेत्रांत मागणी दिसून येईल.
हिरे दागिन्यांच्या खरेदीकडे कल
विवाह सोहळ्यातील 15 टक्के खर्च दागिन्यांवर होत असतो. यंदा सोन्याचे भाव वाढल्याने अनेक खरेदीदार 18 कॅरेट सोन्याकडे वळत आहेत. यंदा हिऱ्याच्या दागिन्यांकडे खरेदीदारांचा कल दिसून येत असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.
आलिशान हॉटेलचे विक्री प्रमुख शेहझाद अस्लम म्हणाले, गतवर्षी याच कालावधीत झालेल्या 15 विवाह सोहळ्यांतून 11 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा 18 सोहळ्यांतून 15 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रतिविवाह 90 लाख रुपयांचा खर्च झाला आहे.
बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार, सण आणि विवाहाशी संलग्न उलाढाल 12 ते 14 लाख कोटी रुपयांवर जाईल. त्यात विवाहाचा वाटा चाडेचार ते पाच लाख कोटी रुपये असेल. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत अर्थगतीची वाढ विवाहाशी संबंधित खरेदीमुळे होईल, असे एचडीएफसीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ साक्षी गुप्ता म्हणाल्या.


























































