रस्ते अडवले, पाठलाग केला; निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपने उभी केली गुंडांची फौज, उज्ज्वला थिटेंनी पहाटे भरला अर्ज

राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात येणाऱ्या अनगर नगरपंचायतीमध्ये धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी अर्ज भरता येऊ नये म्हणून भाजप नेते, माजी आमदार राजन पाटील यांनी गुंडांची फौज उभी केली. उज्वला थिटे या अनगर नगरपरिषदेच्या कार्यालयात पोहोचू नये यासाठी संपूर्ण यंत्रणाही कामाला लावली. मात्र निवडणूक बिनविरोध करण्याचा हा डाव उज्ज्वला थिटे यांनी उधळून लावला आणि सोमवारी पहाटे 5 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांना नगराध्यक्षपदाचे तिकीट देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र येथील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप नेते राजन पाटील यांचे प्रयत्न सुरू होते. यासाठी त्यांनी गुंडांची फौज उभी केली.

उज्ज्वला थिटे अर्ज दाखल करण्यासाठी निघाल्या असता राजन पाटलांच्या गुंडांनी त्यांचा पाठलाग केला. रस्त्यावर ऊसाचे ट्रॅक्टर आडवे लावले. अनगर नगरपंचायतीबाहेरही खास माणसं उभी केली. त्यामुळे उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षण मागण्यासाठी मोहोळ पोलीस स्थानकात गेल्या, मात्र तिथूनही त्यांना धक्के मारून बाहेर काढण्यात आले. राजन पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करत संपूर्ण यंत्रणाच कामाला लावली.

अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी मी अर्ज भरू नये म्हणून माजी आमदार राजन पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील यांनी आठ दिवसांपासून ट्रॅप लावून ठेवला. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. पण लोकशाहीत मला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण मला अर्जही दाखल करू दिला जात नाही. सगळीकडे माणसं उभी केली, गाड्या मागे लावल्या असून पोलीसही सहकार्य करत नसल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला.