पोस्टवर जाण्यासाठी निघाला सैनिक, टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांकडून खांबाला बांधून जबर मारहाण

टोल नाक्यावर एका सैनिकाला खांबाला बांधून जबर मारहाण करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

कपिल कवाड हे सैनिक असून ते भारतीय लष्कराच्या राजपूत रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत. कवाड सुट्टीवर घरी आले होते आणि दिल्ली विमानतळावरून श्रीनगरमधील आपल्या पोस्टवर जाण्यासाठी निघाला होते. कपिल आणि त्यांचे चुलत भाऊ भुनी टोल नाक्यावर वाहतुक कोंडीत अडकले होते. फ्लाइटला उशीर होईल या काळजीपोटी कपिल गाडीतून खाली उतरले आणि टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांशी बोलू लागला. पण यात वाद वाढला आणि पाच टोल कर्मचाऱ्यांनी कपिल व त्यांच्या चुलत भावाला बेदम मारहाण केली. टोलच्या कर्मचाऱ्यांनी कपिल यांना खांबाला बांधले आणि जबर मारहाण केली.

पोलीस अधीक्षक राकेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल हा भारतीय लष्करात कार्यरत आहे. तो आपल्या पोस्टवर परत जात होता. भुनी टोल नाक्यावर मोठी रांग होती. घाई असल्यामुळे त्याने टोल कर्मचाऱ्यांशी बोलणे सुरू केले. यानंतर वाद वाढला आणि कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केली. त्याच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर सरूरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेज व व्हिडिओ तपासल्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके कार्यरत आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कपिल यांनी टोल कर्मचाऱ्यांना आपले गाव टोलमुक्त क्षेत्रात येतं असे सांगितल्यामुळे वादाला सुरुवात झाली. यानंतरच हा वाद वाढत गेला आणि शेवटी सैनिकावर हल्ला करण्यात आला अशी माहिती समोर आली आहे.