स्वतःची स्तुती करणं थांबवा, ऑपरेशन सिंदूरवरील पंतप्रधान मोदींच्या भाषणांवर मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात केलेल्या भाषणांबाबत जोरदार टीका केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व नेत्यांनी संयम राखावा आणि एकजुटीने वागावे, असे आवाहन करत खर्गे यांनी केलं आहे. आपले सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर गेले आहे, त्यामुळे ते परत येईपर्यंत निवडणूक प्रचार करू नये. पंतप्रधान मोदींनी निवडणूक भाषणांमध्ये स्वतःची स्तुती करणारी विधाने करणे टाळावे. संपूर्ण देश सशस्त्र दलांच्या पाठीशी उभा आहे, असंही खर्गे म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “राष्ट्रीय बाबींवर एकता असावी आणि आपल्या विरोधकांना पराभूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर देशभरातील सर्व नेत्यांनी बोलताना संयम बाळगावे. याबाबत बोलण्यापूर्वी नेमके काय घडले याची माहिती घेणे आवश्यक आहे.”

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “पंतप्रधानांनी यापूर्वी सांगितले होते की, त्यांनी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे, मग आता पुन्हा का बोलत आहेत? त्यांनी आत्मप्रशंसेची भाषणे करू नयेत. संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांसोबत आहे.” त्यांनी सरकारवर देशाला दिशाभूल केल्याचा आरोपही केला आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली.