लाल किल्ल्यावर मालकी सांगणाऱ्याला फटकारले, सरन्यायाधीशांनी फेटाळला कथित वारसदार महिलेचा दावा

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला आपल्या मालकीचा आहे, असा दावा करणारी याचिका शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर (द्वितीय) यांच्या पणतूच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. फक्त लाल किल्ल्याची मालकी कशाला मागताय, आग्रा आणि फत्तेपूर सिक्रीदेखील मागा, असा टोला न्यायालयाने या वेळी लगावला. सुलताना बेगम असे याचिकाकर्तीचे नाव आहे.

सुलताना बेगम यांनी स्वतःला मुघल सम्राटाचा कायदेशीर वारस असल्याचा दावा केला आहे. याचिकेमध्ये त्यांनी लाल किल्ल्यावर वारसा हक्क सांगत त्याचा ताबा आपल्याकडे सोपवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यावर महत्त्वपूर्ण सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट केल्या. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी याचिका चुकीची आणि हास्यास्पद असल्याचे सांगत फक्त लाल किल्ल्याची मागणी का करत आहे? आग्रा, फतेहपूर सिक्रीचीसुद्धा का मागत नाही? त्यांना का वगळले पाहिजे? असे उपरोधिक प्रश्न उपस्थित केले.