
‘पक्षवाढीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. ज्यांनी कधी ना कधी आपल्यासोबत काम केले आहे, त्यांची जाणीव माणसाने आयुष्यात नेहमी ठेवली पाहिजे. त्यांच्यावर थेट टीका करत नसल्याचा आरोप केला जातो. मात्र, चार निवडणुकांपैकी तीन वेळा त्यांनी मला मदत केली आहे. एका निवडणुकीत त्यांनी विरोध केला. आम्ही एका ताटात जेवलो. ते हे विसरले असतील; पण माझ्यावर संस्कार आहेत, हे मी कधीही विसरणार नाही,’ असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांना लगावला. ज्यांनी जो मार्ग निवडला आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित मेळाव्यात सुळे बोलत होत्या.
आजही राष्ट्रवादी ही शरद पवार यांची सांगितली जाते आणि हे वास्तव असल्याचे सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पक्षाची स्थापना आणि गेल्या 26 वर्षांचा प्रवास हा सर्वांच्या कष्टाने झाला आहे. यश-अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येते, त्यामुळे हतबल होण्याची गरज नाही. आज येथे उपस्थित असणारे आणि नसणारे असे असंख्य कार्यकर्ते आहेत, ज्यांचे पक्षबांधणीत मोठे योगदान आहे. शरद पवार यांनी संघटना कशासाठी उभी केली, याची विचारधारा आपल्याला माहीत असायला हवी. आपले अंतिम लक्ष्य फक्त सत्ता मिळविणे आहे की, सामान्य जनतेची सेवा करणे आहे, याचा विचार महत्त्वाचा आहे.’
राज्यभर दौरा करणार
‘देशाच्या धोरणनिश्चितीमध्ये पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्ता येत-जात राहील, पण देशाच्या धोरणनिर्मितीमध्ये काम करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. पक्षाची विचारधारा काय आहे, हे समजावून सांगण्यासाठी दर महिन्याला कार्यशाळा आयोजित केली जाईल,’ असेही त्यांनी सांगितले. पुढील महिन्यापासून राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा सुळे यांनी यावेळी केली. हुंडामुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे!
‘काँग्रेसच्या विचारांचे असणाऱ्या हगवणे कुटुंबाला मी अनेक वर्षांपासून ओळखते. माझ्या लोकसभा मतदारसंघात तीन निवडणुकांमध्ये त्यांनी माझ्यासाठी काम केले आहे. ते सुशिक्षित कुटुंब आहे. पण, आज त्या कुटुंबाचं काय झालंय? त्यांची सून हुंड्यामुळे आत्महत्या करते. आपल्याला असा महाराष्ट्र नको आहे.
आपल्याला ‘हुंडामुक्त महाराष्ट्र’ घडवायचा आहे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. केवळ सत्तेत जाणे हेच आपले एकमेव लक्ष्य असता कामा नये. आजपासून पूर्ण ताकदीने लोकांसाठी काम करू. राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला पक्ष पूर्ण ताकदीने सामाजिक प्रश्नांसाठी काम करेल, असा निर्धार करूया,’ असाही सल्ला सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला.