
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पासेसची विक्री केल्याच्या आरोपावरून सहा जणांना अटक झाली होती. त्यातील विधिमंडळ सचिवालयातील चार आणि मंत्रालयातील दोन असे सहा कर्मचारी होते. या सर्वांना सरकारी सेवेतून निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान एमआयडीसीच्या नावाने बनावट लेटरहेडचा वापर करून प्रवेशिका वाटल्याची खळबळजनक माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली होती. या प्रकरणाची सचिवालयाच्या सुरक्षा विभागाकडून चौकशी केली असता विधिमंडळ सचिवालय आणि मंत्रालयातील कर्मचारी यांनी संगनमताने एमआयडीसीच्या बनावट लेटरहेडचा वापर करून प्रवेशिका वाटल्याचे समोर आले. यासंदर्भात 7 जणांवर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये दत्तात्रय गुंजाळ या बाहेरच्या व्यक्तीचा समावेश आहे. सरकारी नियामानुसार 48 तासांपेक्षा जास्त काळ पोलीस अटकेतील व्यक्तीला निलंबित केले जाते. त्यानुसार विधान भवनातील कर्मचारी मनोज मोरबाळे, महेश दुम्पलवार, स्वप्नील तायडे, लवेश नाकडे तर मंत्रालयातील गणपत जावळे, नागेश पाटील या सहा जणांवर आता प्रशानसनाकडून निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



























































