नवे आहेत; पण छावे आहेत, करंदीकर व्याख्यानमालेत दिलीप वेंगसरकर यांची बोलंदाजी

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत इंग्लंडच्या स्वारीवर गेलेल्या ‘टीम इंडिया’तील नव्या दमाच्या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी असेल. बीसीसीआयने दिलेल्या या संधीचे खेळाडूंनी सोने करावे. आपले खेळाडू नवे असले तरी छावे आहेत. त्यांनीही रणजी करंडक आणि आयपीएलमध्ये आपला खेळ दाखवलेला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या थंड वातावरणात ते नक्कीच प्रभावी कामगिरी करतील, असा विश्वास हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केला आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने संघाचे संस्थापक ज. स. करंदीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत दिलीप वेंगसरकर बोलत होते. या वेळी संघाचे अध्यक्ष सुनीत भावे व सरचिटणीस मीनाक्षी गुरव व्यासपीठावर उपस्थित होते. संघाचे चिटणीस सचिन गोरे यांनी सूत्रसंचालन केले, तर सदस्य श्रीकृष्ण पादीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दिलीप वेंगसरकर पुढे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानी खेळाडूंनी इंग्लंडच्या वातावरणात लवकर जुळवून घेतल्यास ते इंग्लंडला कसोटी मालिकेत नक्कीच चारीमुंडय़ा चित करतील. आपल्या संघात नवोदित खेळाडू असले तरी यातील काहींना काऊंटी क्रिकेटचा अनुभव आहे. काहींनी आयपीएलमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडूंचा सामना केलेला आहे. त्यामुळे फक्त इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेतल्यास ‘टीम इंडिया’ नक्कीच यजमान इंग्लंड संघावर वर्चस्व गाजवेल,’’ असा विश्वासही वेंगसरकर यांनी व्यक्त केला.

पहिल्या दोन कसोटींतील वर्चस्व महत्त्वाचे

इंग्लंडच्या दौऱ्यात वातावरण हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फॅक्टर ठरत असतो. त्यामुळे या मालिकेत ‘टीम इंडिया’साठी लीड्स आणि बार्ंमगहम येथील पहिल्या दोन्ही कसोटी महत्त्वाच्या आहेत. या दोन सामन्यांत हिंदुस्थानच्या युवा खेळाडूंना वातावरणाशी जुळवून सुरुवातही दमदार करावी लागणार. पहिल्या दोन कसोटींत वर्चस्व गाजविले, तर नक्कीच हिंदुस्थानी संघाला ही पाच सामन्यांची मालिका जिंकण्याची संधी असेल. संघात रोहित-विराट नसले तरी कर्णधार शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, करुण नायर यांच्या सोबत ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल हेसुद्धा असतीलच. गोलंदाजीबरोबर आपली फलंदाजीही निश्चितच बळकट आहे. इंग्लिश गोलंदाजांसाठी आपले फलंदाज नक्कीच आव्हानात्मक खेळ करतील. जसप्रीत बुमरा, केएल राहुल, पंत व मोहम्मद सिराज या खेळाडूंच्या अनुभवाची शिदोरी नवोदित खेळाडूंना कामी येणार आहे, असेही वेंगसरकर म्हणाले.

आता फिटनेसला आले महत्त्व

आमच्या काळात फलंदाजी आणि गोलंदाजी याला महत्त्व होते. क्षेत्ररक्षण, फिटनेस आणि डाएट या गोष्टींचा फारसा विचार व्हायचा नाही. त्या वेळी संघातील हा क्षेत्ररक्षक चांगला आहे, असे आम्ही म्हणायचो. आता संघातील हा क्षेत्ररक्षक वाईट असे म्हटले जाते. आमच्या वेळी दोन-दोन धावा घेतल्या की दम जिरविण्यासाठी मुद्दाम बुडाची नाडी बांधत बसायचो. सांगायचा मुद्दा म्हणजे पूर्वीपेक्षा आताचे क्रिकेट खूप फास्ट झाले आहे. क्रिकेटमध्ये फिटनेस व डाएटला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे अन् ती काळाची गरजही बनली आहे, असेही वेंगसरकर यांनी सांगितले.

..तर क्रिकेटच संपेल!

सध्या टी-20 सारख्या फास्ट क्रिकेटचा जमाना आलाय. त्यामुळे संघनिवड समितीचे लक्ष्य वेधण्यासाठी नवे फलंदाज फक्त चेंडू मैदानाबाहेर भिरकाविण्याचा प्रयत्न करतात. क्रिकेटपटूंमध्ये संयम नावाची गोष्टच राहिलेली दिसत नाहीये. मात्र कसोटी क्रिकेट हाच या खेळाचा आत्मा आहे. तोच संपला तर क्रिकेटच जिवंत राहणार नाही, अशी भीती दिलीप वेंगसकर यांनी व्यक्त केली.