तेलंगणात भाजपला खिंडार; पक्षातील नेतृत्वाच्या वादामुळे आमदार टी. राजा सिंह यांचा राजीनामा

पार्टी विथ डिफरन्स असे बिरूद मिरवणाऱ्या भाजपमधील अंतर्गत मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. याच अंतर्गत कलहामुळे आता तेंलगणामध्ये भाजपला खिंडार पडले आहे. तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह उर्फ ​​टायगर राजा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले गोशामहलचे आमदार राजा सिंह यांनी राज्यातील नेतृत्वाच्या वादामुळे भाजप सोडण्याची घोषणा केली आहे. राजा सिंह यांनी ट्विटरवर राजीनाम्याची पत्र शेअरकरत मनातील खदखद व्यक्त केली आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, आमचे मौन संमती समजू नये, मी फक्त स्वतःसाठी नाही तर आमच्यासोबत उभ्या असलेल्या आणि निराश झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी आणि मतदारांसाठी बोलत आहे. जय श्री राम. त्यांच्या या पोस्टमधून त्यांची खदखद व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओ संदेशात भाजप नेतृत्वाला पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे आवाहन राजा सिंह यांनी केले होते. पक्षाचे अनेक कार्यकर्ते आपल्याला फोन करत आहेत आणि अध्यक्षपदावर त्यांना पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यांनी पक्षाच्या उच्च कमांडकडून या पदावर काम करण्याची संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. आपली नियुक्ती झाल्यास पक्षात एक समर्पित गोरक्षण शाखा स्थापन करणे, गोरक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ढाल म्हणून उभे राहतील. त्यांनी भाजपचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा निश्चय केला होता. मात्र, त्यांच्या या विनंतीची पक्षाकडून दखल घेण्यात आली नाही.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. रामचंद्र राव यांना तेलंगणा युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची शक्यता आहे. पक्षाच्या सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. केंद्रीय नेतृत्वाने तेलंगणा भाजप अध्यक्ष म्हणून राव यांचे नाव मंजूर केल्याचे मानले जाते. उच्च न्यायालयाचे वकील आणि माजी विधान परिषद सदस्य (एमएलसी) एन. रामचंद्र राव आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

या घडामोडींमुळे संतप्त झालेल्या टी राजा सिंह यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जाते. तेलंगण भाजपचे विद्यमान प्रमुख जी. किशन रेड्डी यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात, राजा सिंह म्हणाले की, हा निर्णय चांगल्या आणि वाईट काळात पक्षासोबत राहिलेल्या लाखो कार्यकर्त्यांचा विश्वासघात दर्शवितो. राजा सिंह यांनी लिहिले की, ‘हा निर्णय केवळ माझ्यासाठीच नाही तर भाजपला पाठिंबा देणाऱ्या मतदारांसाठीही धक्का आहे. मी गप्प राहू शकत नाही किंवा सर्व काही ठीक आहे असे ढोंग करू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.