ठाकरे ब्रॅंण्डचा विजय असो! रत्नागिरीत फटाक्यांची आतषबाजी करत शिवसैनिकांचा जल्लोष

मराठी माणसाच्या एकजुटीसमोर अखेर महायुती सरकारला पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यानंतर शिवसेनेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) फटाक्यांची आतषबाजी करत विजयी जल्लोष साजरा केला. शिवसेना जिंदाबाद,शिवसेनाप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा विजय असो, ठाकरे ब्रॅण्डचा विजय असो अशा घोषणा देत शिवसैनिकांनी जल्लोष केला. शिवसैनिक उद्यापासून रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत जाऊन या लढ्यात सहकार्य करणाऱ्या शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यांचे धन्यवाद मानून मराठी या मातृभाषेतूनच शिका, अशी विनंती करणार असल्याचे उपनेते बाळ माने यांनी सांगितले.

शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वतीने रविवारी जयस्तंभ येथेच पहिली पासून हिंदी भाषा सक्तीच्या परिपत्रकाची होळी केली होती. काल सायंकाळी महायुती सरकारने मराठी एकजुटीसमोर शरण जात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला. त्यानंतर त्याच जयस्तंभ येथे शिवसैनिकांनी विजयी जल्लोष केला. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेते माजी आमदार बाळ माने, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत सांळुखे,शहरसंघटक प्रसाद सावंत, विभागप्रमुख किरण तोडणकर, मयुरेश पाटील, प्रकाश साळवी, दिलावर गोदड, बिपीन शिवलकर,माजी नगरसेवक सलील डाफळे,रशिदा गोदड,उन्नती कोळेकर,सेजल बोराटे,राजश्री शिवलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसैनिक प्रत्येक शाळेत संवाद साधणार- बाळ माने
मराठी माणसांच्या एकजुटीसमोर सरकारला अखेर पहिली पासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करावा लागला.हा आपल्या सर्वांच्या एकजुटीचा,मराठी माणसांचा विजय आहे. 5 जुलै रोजी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत विजयी मिरवणूक आणि विजयी सभा होणार आहे.रत्नागिरीत शिवसैनिक सर्व शाळांमध्ये जाऊन या लढ्यात सहकार्य करणाऱ्या शिक्षक,पालक आणि विद्यार्थी यांचे आभार मानणार असून प्राथमिक शिक्षण हे मातृभाषा मराठीतूनच घ्यावे अशी विनंती करणार आहेत.